Tuesday, May 24, 2022

Is wrong publicity design one of the culprits in Dhaakad’s failure?

 

‘What’s this new perfume?’ My friend asked me when I was going with him somewhere. He was referring to a huge hoarding put up. I also didn’t miss that blood red advertising board with a model looking woman posing in her red mini skirt with deadly looks on her face resembling to Angelina Jolie from Salt. It took me a few seconds to recollect that it was for the newly released movie ‘Dhaakad’. It was a well made poster, obviously inspired by the Hollywood movies. Nothing wrong in it. Many publicity designers follow this tried and tested path. But something I realized very next moment was that this movie bombed at the box office. 

I didn’t I checked the reviews on the internet. They are not as bad as the box office results. ‘Dhaakad’ and ‘Bhul Bhulaiyaa 2’ released on the same date – 20.05.22. Dhaakad has a bigger star in Kangna Ranaut where as Kartik Aryan is yet to be proven as a bankable star. BB2 has goodwill of the first part and a very good director in the form of Anees Bazmi who’s experiencing in handling comic genre. Whereas Dhaakad has been directed by a newcomer Razaneesh Ghai. Yet, Kangana Ranaut has a reputation of pulling her part well and in turn the movie. But here, when you compare the box office results of both of these movies, Bhul Bhulaiyya 2 is doing way better than Dhaakad. In short, it’s over for the later. 

Then I started thinking why this must have happened. If my friend could think of it as an advertising board for a perfume then anybody could think anything. Was this kind of publicity design one of the culprits? 



Dhaakad is quite a desi name which means daring. The movie looks very sleek in the promos and Kangna’s look is also inspired by that of Angelina Jolie’s from the movie Salt or Jennifer Lawrence from Red Sparrow. The publicity designers of Dhaakad made the similar kind of posters for this desi kind of title. Even in the digital age, it’s often the poster or hoarding that decides the fate of a movie. It has to set certain expectations about the movie and if it’s not even looking like a movie poster at all then who’s going to come to know about the movie?



On the other hand Bhul Bhulaiyya 2 gives a clear idea about the genre and theme of the movie. Recently released Marathi movie Chandramukhi too gives a clear idea that it must be a ‘Tamasha culture’ based movie set in the 1960s. 



I am giving these examples because that’s have posters play a role in a movie’s success. But such kind of publicity may mislead the moviegoers. 

So, was that one of the reasons? What do you think?

Wednesday, October 9, 2019

Keep calm. Live more.

10.10.2019

We had this man in our neighbourhood in Sangameshwar where I spent my childhood. He was a total entertainment for children. He could be seen roaming around bare chested and only with his underwear on, soaking in the Konkan monsoons or shivering in the winters. Half of the Konkani men used to be half naked during the summers. So, this guy was no surprise in summers. I have seen him in full clothes only once or twice on an Ashadhi Ekadashi day when we had a very big event at the local Vitthal Temple. Otherwise he was half naked. He was continuously blabbering something gibberish all the time. Nobody would ever understand what he was talking or why he was talking or whom he was talking to. He also never hoped anyone to. He was talking to himself. He would go to any house, sit in the yard. Hosts would serve him with food or water. Sometimes he ate. Sometimes just would sit, stare, blabber and leave. Obviously, such a person must have been an embarrassment to his family. He belonged to a well to do family. But I have never seen his family cursing him. They would talk to him and care for him.
We would chase him and make fun of his walk. He had very peculiar walking style. He would clutch both his palms together, stretched to the top of his hips straight and walk with a slight slouch. He was always bare footed on those muddy roads. He was very thin and his hair was always cropped as a soldier. We used to walk like him beside him and talk. And then laugh. Sometimes, he would not even bothered. Sometimes, he would scold. All the town called him by his name. No child would refer to him as uncle as it was otherwise. He never was offended. He was beyond that. He was lunatic.
Some people would tell the stories that this man was not always like that. Something happened and then he turned that way. But this ‘something’ thing had no cure then. I remember one of my father’s students who was also lunatic in his own way. I heard he couldn’t bare the shock of his girlfriend leaving him. I remember that if you turn lunatic, all you could be treated was with an electric shock – a kind of capital treatment for mental illness. But then that was it.
Earlier people were either sane or insane. There was no grey area.
Later in my life, I came across such people who were insane, because they weren’t sane.
Change is inevitable. 1991 brought many new entrants into Indian lifestyles and money was one of the most visible of them. Urbanisation was another. Cities expanded and families divided. Men had to rush to bigger cities to earn the due of their education. Urban nuclear families needed more money and both in a couple started going out and earning. This was a good sign for economy. But then life became all about running and running short. Salaries came in in multi folds as compared to the earlier generation. Wants became necessities and jobs became targets. Urban lives were filled by insecurities, competition and jealousies. And I think this was the time when India started seeing more spiritual gurus and psychiatrists.
Gurus asked you to listen. But they were psychiatrists who offered you a much needed ear. This was the time insanity was started being considered as a mental state. A state that had cure other than shock treatments and mental hospitals.
Unfortunately I had to deal with this illness with someone really close to me. I could experience the amount of trauma these people go through. There were hundreds of reasons as causes for a deteriorated mental health.
Human mind works mysteriously. It can think in the weirdest possible ways. The person who faces these problem isn’t even aware what they are going through. They believe their imaginary world and fears in it. One needs good psychiatric help along with the trust of the people around. They need to be felt considered, included. Most of the times, our lifestyle makes us forget that we have someone who needs us.
Communication is the key.

Meet in person regularly if possible. Video call. Talk over the phone. Or at least chat with them. It’s ok even if it’s just a WhatsApp. Keeping in touch is really important.
Back in Sangameshwar, we had only one or two of such people who needed help. Unfortunately, they might not have gotten it then. But now this ailment is right among us.
It’s World Mental Health Day today. This proves that you are not alone. It’s worldwide. Believe me, mental illness is curable. I met some wonderful doctors and I have seen people getting normal and leading an even better life.
If someone gets scared for no valid reason or someone is not happy even when there’s nothing to be unhappy in your opinion or if someone’s silent all of a sudden, all they need is your help. Go talk to them. Listen what they have to say. If you can’t make them talk, take medical help. Don’t hesitate. Don’t be scared. It’s that person’s life which is more important than your image in the society. Nobody is lunatic these days. People are sane or people are sick. They may be psychologically unstable. Let them get calm. Help them being healed.

Amol Girish Bakshi
9822667577

Saturday, September 28, 2019

रात्रीचा पाऊस – भाग ३

कोकणातले डोंगर म्हणजे कोकणातल्या गूढरम्य कथांचे उगमस्थान. भरपूर झाडी. वाटेत करवंदाच्या, कण्हेरीच्या जाळ्या. भरपूर जंगली झाडं. ही ओळखीची, बरीचशी रानटी. पायवाटांचं जाळं. एखाद्या झुडुपामागं जाऊन एखादी वाट अचानक गुडूप होते. या वाटांची माहिती असल्याशिवाय जाण्यात शहाणपणा नाही. वाटांच्या जाळ्यात फसलं की तिथंच फिरत बसायचं. मग चकवा लागला म्हणून सांगायचं. आमच्या घरांना पाण्याच्या हवाली करून आम्ही सगळे डोंगरातून निघालो. पाऊस होताच सोबतीला. पायवाटांमधून छोटे पाण्याचे प्रवाह पाय धुवून काढत होते. आणि त्याचबरोबर पाय खंबीरपणे रोवता येऊ नये याचीही दक्षता घेत होते. त्यामुळं चालणं अजूनच अवघड होतं. झाडांच्या फांद्या मोडून त्या काठ्या आधारासाठी घेतल्या होत्या.
कोकणात आम्ही राहायला गेल्यावर आम्हाला बेगमीचं महत्त्व कळलं होतं. म्हणजे आईबाबांना, मी लहान होतो. चार महिने पावसाचे. काहीही आणायला बाहेर जायचंही अवघड. त्यात आणताना ते पावसात सुरक्षित राहील याचीही खात्री नाहीच. त्यामुळं होता होईल तेवढ्या गोष्टी पावसाळ्याच्या आधी भरून, निवडून, मुंग्या होऊ नये म्हणून पावडर लावून ठेवून द्यायचं. तसं आमच्या घरीही ठेवलं होतं. आम्ही ज्या खोलीत राहत होतो, तो एक मोठी पडवी होती. फरशा घातल्या होत्या. तीन बाजूंना भिंती आणि पऱ्ह्याकडच्या बाजूला खाली तीन चतुर्थांश भागात बांधकाम आणि उतरलेली भिंत म्हणजे मोठ्या खिडक्या. त्यांना लोखंडी सळ्यांचे गज. पऱ्हयाचं पाणी तिथूनच घरात घुसलं. पावसाळ्यासाठी ठेवलेलं धान्य भिजलं. छोटी छोटी भांडी, चमचे, वाट्या त्यातनं वाहून गेल्या. बाबांचा पगार नुकताच झाला होता. घरी नवं गोदरेजचं कपाट घेतलं होतं. घरात पाणी वाढायला लागल्यावर बाबांनी पाण्यातून जात कपाटातून पैसे काढून स्वत:जवळ ठेवले. कपाटाला कुलूप घातलं. त्यावेळी त्यांना ते नुकसान दिसलं. ते घरी असताना डोंगरात प्रचंड मोठा आवाज आला. बाबा आणि उरलेली पुरूष मंडळी घरातून ताबडतोब बाहेर पडली. नदी आणि डोंगराची भेट बहुतेक आमच्या घरी व्हायची होती.
नुसत्या पाण्यात कोलमडून जावं एवढं ते जोशींचं घर तकलादू नव्हतं. चांगल्या चिऱ्याच्या भिंती होत्या. पण दरड कोसळली तर मात्र कशाचंच काही खरं नव्हतं. मागं काय झालं असेल हा विचार करण्याची ते वेळ नव्हती. जीव वाचवायला आम्ही डोंगरवाटांतून निघालो होतो. एकमकांचे हात धरून, मुलांना मध्ये ठेवत आमचा तांडा निघाला होता. पण संकटं अजून संपली नव्हती. ती तशी संपणारही नव्हती. अंगावरच्या कपड्यांवर स्वत:च्या घरातून बाहेर पडावं लागल्यानंतर संकटं तर सुरू होतात. पुढं एक दांडगा पऱ्ह्या होता. म्हणजे आमच्या घराशेजारच्या पऱ्ह्याएवढा मोठा नसला तरी वेग काही कमी नव्हता. डोंगराच्या शिखरावर पडलेल्या पाण्याला घाईनं घेऊन हा गडी खाली नदीला भेटायला निघाला होतात. वाटेत सगेसोयरे ओहळ त्याला भेटत होते.
अडीच तीन फूटाची रूंदी. पण एक पाय जरी त्यात पडला तर नदीलाच भेटायचं. वाटेत आधाला झाड मिळालं तरी हातपाय मोडणं, नाकातोंडात पाणी जाणं, गेलाबाजार कपाळाला खोक पडणं इतपत हानी तरी होणारच. पुढं जायचं असेल तर तो ओलांडणं भाग होतं. कोकणातले लोक काटक आणि धाडसीपण. निम्म्या लोकांनी त्यावरून उड्या मारल्या. पलिकडं गेले. ज्यांना पोहता येत नव्हतं ते बिचकत होते. पोहता येत असले तरी पलिकडं उडी मारण्यासाठी जिगर पाहिजे. तसंही जिथं होतो तिथंही काही सुखाची सुरक्षित परिस्थिती नव्हतीच. त्यामुळं उडी मारण्याशिवाय पर्यायही नव्हता. परिस्थिती तुम्हाला सगळं शिकवते. माझ्या बाबांचं उभं आयुष्य शहरात गेलेलं. असल्या कुठल्याच गोष्टीची त्यांना सवय नव्हती. माहितीही नव्हती. पोहता येत नव्हतं. पण अशा स्थितीत करणार काय? मारली उडी. केली हिंमत.
पुन्हा एकदा आमचा तांडा निघाला. डोंगराच्या दुसऱ्या बाजूला प्रभाकर भिडेंचं घर होतं. त्यांच्या घराच्या आवारातचं त्यांचं स्वत:चं गणपती मंदिर होतं. तीसपस्तीस लोकं दारात बघून एखादा घाबरून गेला असता. कदाचित त्यांना ठेवून घेतलंही नसतं. पण तेव्हा माणुसकीचे डोंगर होते. बेटं झाली नव्हती. प्रभाकरकाकाही खाऊनपिऊन सुखी असणारे. पण पावसाळ्याची बेगमी त्यांनी आमच्यावर संपवली असावी. तीन दिवस सकाळ-संध्याकाळचा चहा, तीनवेळा कुळथाचं पिठलं आणि भात. सगळे मिळून पन्नासेक माणसं जेवत होती. गणपतीच्या देवळात, त्यांच्या घरी जिथं जागा मिळेल तिथं ही माणसं विसावत होती. बाहेरच्या जगाशी संपर्काचं रेडिओ हे एकमेव साधन. मला नीटसं आठवत नाही. पण बहुतेक बाबांनीसुद्धा ट्रांझिस्टर बरोबर आणला होता. संपूर्ण जिल्ह्यात पुराचं थैमान होतं. त्या रात्री पडलेला प्रचंड पाऊस, त्यामुळं धरणाचे दरवाजे उघडलेले आणि त्यात समुद्राच्या भरतीचं पाणी खाडीतून आत आलेलं. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे आमचं पूरग्रस्त होणं. त्यातही आम्ही लपाछपी खेळायचो.
जे रेडिओवर ऐकलं ते डोळ्यांनाही दिसतच होतं. भिडेंचं घर उंचावर होतं. तिथून खाली पाहिलं की लाल रंगाचा समुद्र. फक्त वाहता. त्यातून लाकडाचे ओंडके वाहायचे. कुणाच्या संसारातली एखादी न बुडालेली घागर वर तोंड करत डचमळत हेलकावे खात जायची. कधी कपडे. कधी एखाद्या गायीम्हशीचं कलेवर समुद्रकडं वाहताना दिसायचं.
तीन दिवसांनी पाणी उतरलं. पाऊसही कमी झाला होता. आम्ही आलो त्याच मार्गानं डोंगरातनं घराकडं गेलो. कारण रस्त्यावर चिखलाचा थर चढला होता. घरीही काही फार वेगळी परिस्थिती नव्हती. सुदैवानं आमच्या घरात फरशी होती. त्यावरचा चिखल साफ करणं तुलनेनं सोपं होतं. बाकीच्यांच्या सारवलेल्या जमिनी होत्या. त्या आता चिखलानं माखल्या होत्या. घरभर धान्य कुजल्यान, कपडे भिजल्यानं कुबट वास दाटला होता. आता पुढची वाट बिकट होती. सगळीच माणसं कामाला लागली.
मला आठवतंय, ते संघाचे स्वयंसेवक. हेलिकॉप्टरमधून पोळ्या टाकल्या जायच्या. ही मंडळी पाणी, चिखल, दरड कशाची पर्वा न करता आमच्यासारख्यांपर्यंत पोहोचवत होती. पाणी उतरायला लागलं तसं निरनिराळ्या बातम्यांचा पूर आला. काही अफवा. काही बातम्या. आख्खी बाजारपेठ तीन दिवस पाण्यात होती. जवळपास सगळ्या दुकानांमधला माल अक्षरश: पाण्यात होता. एखाद्या दुकानात कोरडा माल शिल्लक होता. तो दुकानदार एक रूपयाचा बिस्कीटपुडा पाच रूपयांना विकत होता. शेवटी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत तक्रार गेली आणि त्याला तंबी मिळाली.
बाबांचे मित्र, शेटेकाका, पाण्याचा जोर वाढताना आमच्या घरून निघाले. जीवाच्या करारावर छातीभर पाण्यातून वाट काढत सुखरूप घरी पोहोचले होते. संगमेश्वरातून मुंबई गोवा हायवे जातो. हायवेवर एका ठिकाणी एक वळण आहे. जवळपास हेअरपिन बेंड. वळणाच्या मधोमध मोठा पऱ्ह्या. एका बाजूच्या डोंगरावरून धडधडत येतो आणि रस्त्याच्या खालून पन्नासएक फूट दरीत तो कोसळतो. तर या वळणावरच्या डोंगराजवळ आमच्या गावातले तिघंजण गेले होते. त्यातले एक होते माझे गुरूजी, पाथरेगुरूजी, दुसरे बाबांच्या शाळेतले शिक्षक, पाडळकरसर आणि तिसऱ्या व्यक्तीचं नाव मला आठवत नाही. त्यांचीही घरं पाण्याखाली होती. प्रातर्विधीसाठी तिथं गेले. अचानक डोंगर कोसळला. हायवे बंद झाला. त्यातले एकटे पाथरेगुरूजी कसेबसे वाचले. पुढं कित्येक वर्षं तेही लंगडत चालायचे. आमच्या माहिततली ही दुर्घटना. अशा माहित नसलेल्या कितीतरी घरांत पावसानं असाच हाहाकार माजवलेला होता.
पुरग्रस्तांसाठी शासनाची, विविध सेवाभावी संस्थांची मदत आली. प्रत्येक घरातील व्यक्तीनुसार, धान्याचे वाटे, कपडे घ्यायला रांगेत उभं राहायचं. मुलांना फार मजा वाटायची. आई नंतर सांगत होती की याचकासारखं तांदळाच्या दाण्यालासुद्धा मोताज झाल्यावर डोळ्यात पाणी यायचं. राजा आणि रंक सगळ्यांची एकच अवस्था. खिशात पैसे असतील कदाचित. खरेदी करायला दुकान तरी हवं. आमच्या घरमालकांच्या दुकानातही पाणी शिरलं. कुजलेलं धान्य टाकून दिलं. जे वाचवून वरच्या बाजूला ठेवलं होतं ते पाण्यानं सर्दावलं होतं. त्यामुळं तेही फार उपयोगाचं नव्हतंच. फक्त मऊ पडलेली बिस्किटं आम्ही कित्येक दिवस खात होतो.
पुढं जेवढी वर्षं मी तिथं होतो, त्यातल्या प्रत्येक वेळी रात्रीचा मुसळधार पाऊस झाला की भीती वाटायची. पण त्यानंतर कधीच घरात पाणी आलं नाही. तेवढं एकच वर्ष.
यंदा कोल्हापूर, सांगलीचा पूर बघितला. तीच दृष्य टीव्हीवर, इंटरनेटवर पाहिली. संगमेश्वर आठवलं. आपत्तीग्रस्तांचं दु:ख समजायला आपत्ती सहन करायलाच हवी असं नाही. विचार करणारं डोकं आणि जाणीवा जिवंत असलेलं मन असलं तरी पुरतं. पण मला तशाच संकटातून गेल्यामुळं थोडं जास्त डाचत होतं. त्यात कालपरवा पुण्यात पावसानं कहर केला. आख्ख्या पावसाळ्यात जे घडलं नाही, ते दोन तासांत झालं. आणि यावेळी तर माणसं तयारीतही नव्हती. हा परतीचा पाऊस होता.
ते डायनॉसॉरच्या किंवा गॉडझिलाच्या सिनेमात नेहमी बघितलेलं आठवतं की तो अजस्त्र देह तिथून निघून जातो. आपल्याला वाटतं झालं. वाचली मंडळी. आणि नेमकं त्याच्या शेपटीचा फटका लागतो आणि वाताहत होते. तेच केलं त्या रात्रीच्या पावसानं. माझ्या मुलाच्या शाळेत काम करणाऱी एक महिला, आमच्या सोसायटीतल्या एका काकूंचा सख्खा भाऊ आणि असे कितीतरी आई, बाप, भाऊ, बहिणी, मुलं, मुली अक्षरश: फरपटत बुडवून टाकली रात्रीच्या पावसानं. बाकीचं नुकसान भरूनही येईल. पुन्हा एकदा उदंतेचा हव्यास.
महाभारताच्या काळात सुर्यस्ताला युद्धही थांबवली जात. मग असा कसा पाऊस प्रत्येक वेळी रात्रीचा, आपण बेसावध असतानाच आपल्यावर हल्ला करतो?

(समाप्त)

Friday, September 27, 2019

रात्रीचा पाऊस – भाग २

नदीला पूर येतो म्हणजे नेमकं काय होतं हे मला १९८२ साली कळलं. तोपर्यंत मला आपली नदी माहित होती. पुलावरून गाडी जायला लागली की नदी दिसते. तिला नमस्कार करायचा कारण ती पाणी देते आपल्याला. तेवढाच नदीचा माझा संबंध. संगमेश्वरला गेल्यावर नदी रोजच भेटायला लागली. पुलावरूनच. पण आता आम्ही चालत जायचो पुलावरून. त्यामुळं येताजाता नदी दिसायचीच. पावसाळा असल्यामुळं कधीकधी पात्रातून बाहेर यायची. तेव्हाही आमच्या पायऱ्यांपर्यंत आली ती अशी रौद्र वगैरे नाही वाटली. त्यातही रात्र असल्यामुळं ती भीषणता जाणवली नसेल. आणि आमच्या घरात जरी आली नाही, तरी संगमेश्वरच्या बाजारपेठेत पाणी शिरलं होतं. अगदी रस्त्यालगतच्या दुकानांमध्ये पाणी शिरलं होतं. पण तो पहिला पुराचा अनुभव. रात्रीच्या पावसानं आणलेला रात्रीचा पूर.


त्यावर्षी परत काही पाणी आलं नाही. पुढचा पावसाळा १९८३ सालचा. आता पावसाळ्याची थोडी सवय झाली होती. आणि त्या वेळेपर्यंत तरी ऋतुचक्र इमानदारीत चालायचं. म्हणजे मेमध्ये वळीव, साधारण सात जूनच्या आसपास पहिला पाऊस, पेरणी, मृगाचे मखमली किडे, थोडा जास्त पाऊस, भातलावणी, मुसळधार, चिखल, हिरवे डोंगर, त्यातले धबधबे, मध्येच उघडीप, श्रावणातला पाऊस, मग असा पडत पडत सप्टेंबरपर्यंत संपायचा. मग थंडी, उन्हाळा, पुन्हा पाऊस. पावसाळ्याच्या सुरूवातीच्या दिवसात बिरंबोळे यायचे. छोटंसं रोपटं. पानावरून ओळखायचं. त्याची मुळं व्यवस्थित खणून काढायची. तो बिरंबोळा. साल काढायची आणि खायचा. साधारण कुठलंही कंदमूळ चवीला लागतं तशीच याची चव असायची. मोठी मुलं म्हणायची की व्यवस्थित खणलं नाही तर मुळांचं पाणी होतं. सुरूवातीला खरं वाटायचं. एकदा बिरंबोळा खणताना रोपटं तुटलं. तरी मी खणून मूळ बाहेर काढलं. तेव्हा कळलं की असं काही नसतं. कदाचित रोप तुटलं तर नेमक्या मुळापर्यंत पोचता येणार नाही म्हणून ती धमकी असावी. आपल्या व्यवहारातही बऱ्याचदा आपल्याला अशा धमक्या ऐकायला मिळतात. तसाच हाही प्रकार.
तर त्यावर्षीसुद्धा आमचे पावसाळी उद्योग सुरू होते. पुरेसा पाऊस सुरू झाला असावा कारण पऱ्ह्या पूर्ण वेगाने वाहू लागला होता. तेव्हा आम्हाला प्यायचं पाणी म्हणजे विहीरीचं. पावसाळ्यात मोटर बंद. मग रहाटानं ओढायचं. ते काम आईला बरोबर जमायचं. मीही शिकायचा प्रयत्न करत होतो. पण काढणीला जोर पोचायचा नाही. आमचे घरमालक खूपच प्रगतीशील होते. प्लॉटच्या चढऊताराचा व्यवस्थित उपयोग करत उंचावर पाण्याची टाकी बनवली होती. पावसाळ्याच्या दिवसात डोंगरातल्या जिवंत झऱ्यांमधून पन्हाळीतून पाणी टाकीत पडायचं पन्हाळीसाठी घरच्याच पोफळीचा वापर केलेला. पावसाळा संपला आणि हे पाणी आटलं की मग विहीराला पंप बसवायचा आणि ते पाणी टाकीत आणायचं ते वापरायचं पाणी. प्यायचं मात्र थेट विहीरीतून भरायचं. पावसाळ्यात विहीर वरपर्यंत यायची. तरी तळ दिसायचा. कासवं फिरायची.
जुलैमध्ये नेमहीप्रमाणे पावसाचा जोर वाढला होता. वीज जायचं प्रमाणही वाढलं. म्हणजे सगळं नेहमीप्रमाणं होतं. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस थांबला नव्हता. साधरण पाचसहा दिवस सुरूच. बर कोकणातला पाऊस पूर्ण क्षमतेनं पडू लागला की साधारण पाच फुटावरचं दिसणं मुश्किल. तसाच तो सलग पडत होता. दिवसा पाऊस, रात्री पाऊस. निरनिराळ्या गावांमधल्या पुराच्या बातम्या यायला लागल्या होत्या. नदीनं पात्र ओलांडलं होतं. पण एकदोन दिवस तिचा शेतातच मुक्काम पडला होता.
२७ जुलैला असाच दिवसभर कोसळला. तोपर्यंत व्यवहार सुरू होते. पण कमी प्रमाणात. मागच्या वर्षीच्या पुरामुळे गावातल्या लोकांना नाही म्हटलं तरी एक शंका होतीच. रात्र होईपर्यंत नदी शेतातून रस्त्यापर्यंत आली होती. अंधार पडल्यावर नदीत टॉर्चचे झोत चमकत होते. पाणी बऱ्यापैकी वाढलं होतं. मोठी मंड मंडळी खुर्च्या टाकून पाण्यावर नजर ठेवून होते. आधीच्या अनुभवानुसार सामानसुमान उंचावर ठेवायची तयारी होती. घरमालकांचं घर दुमजली होतं. तिथं त्यांनी काही सामान हलवलं होतं. हळूहळू पाणी पहिल्या पायरीपर्यंत आलं. मागच्या वर्षीच्या आठवणी जाग्या झाल्या. तरी सगळे म्हणत होते की नाही येणार पाणी. मागच्या वर्षीचा अनुभव होताच. चौथ्या पायरीपर्यंत पाणी आल्यावर काकूंनी ओटी भरली. नदीला रक्षा कर म्हणून साकडं घातलं.
त्या रात्री बाबांचे खास मित्र शेटेकाका आमच्याकडं आले होते. पाण्याची एकंदर स्थिती पाहता आईबाबांनी त्यांना आग्रह केला की इथंच थांबा. कारण पाण्याचं काही खरं नाही. तुम्ही इतक्या लांब रात्रीचे पाण्यातून कसं जाणार. पण काकांनी ऐकलं नाही. पाणी वाढायला लागलं तसं बाबांना ती काळजी लागून राहिली की हे व्यवस्थित पोचले असतील का. कुठं अडकले तर काय करायचं? आख्ख्या गावात फारतर पंचवीस फोन. त्यातले वीस दुकानांमध्येच. ती पाण्याखाली. आणि फोन तर करायचा कुठून? विचारणार तर कसं आणि कोणाला?
पुढं रात्री एकदोन वाजता कधीतरी नदीनं काकूंचं ऐकलं. पाणी माघारी जाऊ लागलं. आम्ही मुलं माडीवरच झोपलो होतो. आम्हाला काहीच माहिती नव्हतं. पहाटेच्या सुमारास अचानक गोंधळ सुरू झाला. बोलण्याच्या आवाजानं आम्ही उठलो. नदीनं हुलकावणी दिली होती. पाणी आमच्या अंगणात येऊन पोचलं होतं.
आमच्या घरमालकांचं रेशनचं दुकान होतं बाजारपेठेत. ते आणि त्यांचा मोठा मुलगा, भैया, दुकानातला माल सुरक्षित हलवायला गेले होते. इकडं घरी बाबा आणि अजून एक भाडेकरू. तेवढीच पुरूष माणसं. घरमालकांची गाईगुरं होती. गुरं मोकळी सोडली नाहीत तर हकनाक मरणार. बाबांना त्या कामाचा काडीचा अनुभव नाही. पण त्यांनी कसंबसं ती दावी कापली. गुरांना मोकळं केलं. पाणी वाढतंच होतं. तोपर्यंत दादा, आमचे घरमालक आणि भैया दोघंही आले. सोनवी पुलावर छातीभर पाणी होतं. त्यातनं चालत ते आले.

पाणी घराच्या पायरीला लागेपर्यंत सकाळ उजाडली. २८ जुलै. आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस. त्याचदिवशी संकष्टीपण होती. मुलं सोडल्यास सगळ्यांचेच उपवास. आम्ही वरच्या मजल्यावर बसून हे सगळं पाहत होतो. सर्वांना अजूनही विश्वास होत की याच्यापुढं पाणी यायचं नाही. आम्हाला खाली यायला बंदी होती. चहा झाला. त्यानंतर पंधरावीस मिनिटांत पाणी घरात घुसलं. आजपर्यंत जे घडलं नव्हतं ते त्या वर्षी झालं. गावकऱ्यांची आई, जीवनदायिनी सोनवी नदी, त्यांची खुशाली विचारायला त्यांच्या उंबऱ्यापार आली.
आता मात्र मोठ्यांनी निर्णय घेतला. मुलांना आधी हलवायचं. आमच्या घराशेजारीच चाळ होती. तिथं चार कुटुंबं राहायची. माझे दोन मित्र तिथं राहायचे. आमच्या घराशेजारी वाहणारा पऱ्ह्या होता, त्यानंही पात्र सोडलं. त्याचं पाणी दुसऱ्या बाजूनं घरात घुसलं. आता तिथं थांबून चालणार नव्हतं. पाऊस सुरू होताच. आमचे घरमालक, दादा, उंचापुरा धिप्पाड इसम. जसं शरीर तसंच काळीज.
घरात छातीभर पाणी. डबे भांडी तरंगताहेत. एका खांद्यावर मी आणि दुसऱ्या खांद्यावर त्यांचा मुलगा, शैलेश. त्यांनी आम्हाला सांगितलं की दोन गोष्टी करायच्या. एक म्हणजे दार आलं की खाली वाकायचं आणि दुसरं पाण्यामुळं दार मिटलं जाणार नाही याची काळजी घ्यायची. आम्हाला दोघांना मजा वाटत होती. दार दिसलं की आम्ही जोरात ओरडून एकमेकांना सांगायचो. खाली वाकून दार उघडून धरायचं. दादा त्यातून पुढं जायचे. अशी तीन दारं पार केली. परसात आलो. पाऊस होताच. मध्येच एक गटार होतं. आम्हाला साधारण त्याची जागा माहित होती. गटार पाण्याखाली गेलेली. दादांना भीती ही की जर त्यांचा पाय पाण्यात गेला तर आम्ही पाण्यात पडणार. अंदाज घेत घेत त्यांनी गटार ओलांडली. आम्हाला सुरक्षित जागी सोडलं. नंतर माझ्या दोन्ही मित्रांना त्यांनी याच पद्धतीनं तिथं आणलं. तोपर्यंत भैयानं गायीच्या वासराला लहान बाळासारखं हातात धरून आणलं. यंदाच्या पुरात अशा दृष्यांचे फोटो पाहिल्यावर दादा आणि भैयाच दिसले मला तिथं.
कोकणातले संडास पऱ्ह्याकाठी असतात. आमचा थोडा उंच होता. आमची सुरक्षित जागा. मुलांना आतमध्ये ठेवलं आमच्या आया छत्री घेऊन बाहेर. पुरूष मंडळी एकेकाला तिथं आणून सोडत होते.
पाणी कमी होत नव्हतं. कधी होणार माहित नव्हतं. तिथंच थांबून उपासमारीचीच शक्यता. पुरस्थिताच कसा सामना करायचा कुणालाच माहिती नव्हती. आमच्या घरातले आणि जवळच्या चाळीतले आठ कुटुंबातले साधारण तीस-पस्तीस लोक. एवढे सगळे जण जाणार कुठं. घराच्या पुढच्या बाजूला नदीचे पाणी. एका बाजूला पऱ्ह्या आणि पाठीमागं डोंगर. शेवटी असं ठरलं की डोंगरातून वाट काढत काढत जायचं. आमच्या माभळ्यातली (आम्ही राहत होतो त्या भागाचं नाव) काही घरं उंचावर होती. त्यांच्यापैकी एका ठिकाणी तरी पोचलं पाहिजे. त्यासाठी डोंगरातून जायचं. पावसाळ्यात आम्ही शक्यतो डोंगरात जात नव्हतो. उन्हाळ्यात जायचो. करवंदासाठी. आता त्या डोंगराच्या निसरड्या वाटेतून जायला लागणार होतं. चप्पल नव्हत्याच पायात. जीव तर वाचवायला हवा.

(क्रमश:)

Thursday, September 26, 2019

रात्रीचा पाऊस – भाग १

‘बा पावसा.. इथं पडतोयंस.. तसा माझ्या महाराष्ट्रात जा.. तिथं तुझी गरज आहे. शेतकरी तुझी वाट पाहतोय. जा तिकडे पड.. जा’ साधारण अशाच आशयाचं काहीतरी आपल्या केदार जाधवनं इंग्लंडच्या पावसाला सांगितलं. महाकवि कालिदासांनी मेघाला दूत बनवून आपल्या सखीकडं पाठवलं. तसंच या पठ्ठ्यानं थेट पावसाला साता समुद्रापारहून आमच्याकडं पाठवलं. जुलै आला तरी पाऊस पडत नव्हता. पाऊस न पडण्याची कारणं वेगळी तशी प्रत्येकाच्या काळज्यासुद्धा वेगवेगळ्या होत्या. दुष्काळ पडला तर सत्ताधाऱ्यांना चिंता की येत्या निवडणुकीत मतदारांना तोंड देताना नवं गाजर शोधावं लागेल. पाऊस पडला, सुगी झाली तर विरोधकांना चिंता की यांच्यावर गोळीबार करायसाठी नवं कारण शोधावं लागेल. माझ्यासारख्याला पिण्याच्या पाण्याचा चिंता आणि शेतकऱ्याला अर्थातच जगण्याची चिंता. तर या सगळ्या चिंतांना केदार जाधवच्या ढगांनी पार धुवून काढलं. भरपूर पाऊस झाला. आमच्या कोल्हापूरात म्हणतात तसा बद्द्या पाऊस पडला.
आता सप्टेंबर संपत आला तरी पाऊस मुक्काम हलवत नाही, म्हटल्यावर मंडळींची जरा कालवाकालव सुरू झाली. पावसाला आतुरतेनं वगैरे वाट पाहणारी, पहिल्या सरीनंतर एकूण हंगामाच्या सरासरीपेक्षा जास्त कविता पाडणारी, उगाच वाफाळणारे चहाचे कप, कांदाभजी, भाजलेली कणसं, पावसात भिजलेल्या अगडबंब देहांचे फोटोबिटो यांचा पाऊस फेसबुकवर पाडणाऱ्या मंडळींचं पावसानं कवित्वाला धुमारे फुटायचे बंद झालेत. ‘आता पुरे यार..’ ‘कंटाळा आला राव’ ‘बास आता पाऊस’ अशा कमेंट्स जागोजागी ऐकू यायला लागलेत. दिवाळी करूनच जातो बहुतेक वगैरे, पावसावर विनोद सुरू झालेत आता.

लहानपण कोकणात गेल्यामुळं पुण्यातल्या पावसाची भीती वगैरे कधी वाटलीच नाही. आठ दिवस पाऊस थांबत नाही, दहा-पंधरा दिवस सूर्य दिसत नाही, सतत २४ तास घराशेजारून धबधब्यासारखा कोसळणारा पऱ्ह्या (ओढा), त्याचा आवाज, नदीकडं लक्ष ठेवून कामं करायची. घरातून नदी दिसली की शाळेला दांडी. कारण शाळेच्या रस्त्यात नक्की तिचं पाणी आलेलं असणार. तीच गोष्ट शाळेत असतानाची. ग्राऊंडच्या पलिकडं नदीपात्रात चहासारखी नदी वर डोकावू लागली की शाळा सोडून द्यायचे. आम्ही गावात राहायचो. पण वाडीत जाणाऱ्या मुलांना डोंगर, दरी, पऱ्हे ओलांडून ये-जा करायला लागायची. ती मुलं बऱ्याचदा शाळेत यायचीच नाहीत. आली तरी त्यांना लवकर सोडायचे. रेनकोट, छत्री अशा गोष्टी पावसापासून बचाव करायसाठी म्हणून बाजारात मिळायची. त्या आम्ही वापरायचोपण. फक्त शाळेत जाईपर्यंत स्वत:चे कपडे कोरडे ठेवायचे. येताना भिजायचं. म्हणजे आपल्याला फार काही करायला लागत नसायचं. आपण भिजायचोच. पण सगळ्यांनाच सगळ्याची सवय झालेली.
माझी आई तर अशा पावसात पळतपळत जाऊन बस पकडायची. तिथून अर्धाएक तासाचा प्रवास करून एका छोट्या गावात पोहोचायची. तिथून छोटासा डोंगर उतरायचा. भातखाचरांच्या बांधावरून किलोमीटरभर चालायचं. एकावेळी एकच माणूस. साधारण १०-१५ माणसांची रांग लागायची. मग समोर शंभरएक मीटरची खाडी. गढुळलेलं पाणी समुद्राकडं चाललेलं. तिथं गुडघाभर चिखलातून काही पावलं चाललं की मग होडक्यात बसायचं. पावसाळा नसताना याच पात्राची रूंदी निम्म्यानं कमी व्हायची. वेगही एवढा नसायचा. मग होडीला एक इंजिन बसवलेलं असायचं. तेव्हा त्या होडक्याला डिबको म्हणायचं. त्याचं कारण अजूनही कळलेलं नाही मला. पण पावसाळ्यात ही होडी किंवा तर. आपल्याला नदीपलिकडं जिथं पोहोचायचंय त्यापासून प्रवाहाच्या विरूद्ध बाजूला एक किलोमीटरभर होडी पाण्यात लोटायची. पन्नासएक फूट बांबूने प्रवाहात भरकटण्यापासून वाचवायचा प्रयत्न करायचा. दुसरा एकजण वल्ह्यानं होडीला दिशा द्यायचा. एवढं सगळं झाल्यावर ती होडी पलिकडं पोहोचली की पुन्हा चिखल तुडवायचा. छोटीशी चढण चढायची. वरून पाणी दुडदुडत यायचं. ते तुमची वाट अडवणार. त्यात पुन्हा पाय घसरायची भीती होतीच. एका हातात छत्री, दुसऱ्या हातानं साडी थोडी वर उचलायची. खांद्यावर पर्स. असं शाळेत जायचं. तिथंही पावसापाण्यातून जेवढी मुलं आली आहेत, त्यांना शिकवायचं. संध्याकाळी पुन्हा उलट्या क्रमानं घरी पोचायचं. बस चुकली तर पुढची बस एकदीड तासानंतरची, तीही पावसापाण्यातून वेळेत आली तर. म्हणजे रोज साडेसहाला घरी यायची ती अशावेळी साडेआठ वाजायचे. मी आणि बाबा स्टँडवर जायचो तिला आणायला. गावात सामसूम झालेली असायची. मुंबई-गोवा हायवेचं गाव असल्यामुळं एस.स्टँडवर दहावीस माणसं, एखादी रिक्षा, वडापावच्या दोन गाड्या, एक भुर्जीपाववाला. मग ही गाडी आली की गाडीतनं उतरलेल्या दहापंधरा माणसांची त्यात भर पडायची. पुन्हा सामसूम. माझ्या आईबरोबर खातूकाकू आणि त्यांचे पती खातूसर, पराडकर सर अशी मंडळी असायची म्हणून तेवढाच आधार. तीही मंडळी इतक्याच अडचणीतून कामाच्या ठिकाणी जाऊन यायची. इतरही काही लोक वेगवेगळ्या गावांना कामानिमित्त अशाच परिस्थितीतून रोज जाऊन यायची.
त्यामुळं या सगळ्यासमोर पुण्यातला पाऊस अगदीच चिल्लर वाटायचा.

यंदा पाऊस खूप लांबलाय. सप्टेंबर महिन्यातसुद्धा एखादाच दिवस बिनपावसाचा गेला असेल. ते कसं आहे ना की आपण माणसांनी निसर्गाचे सगळे नियम वाकवायचे. पण निसर्गानं मात्र तेच करायचं जे आपल्याला हवंय. तीच गोष्ट यंदापण झाली आहे. पाऊस परतलाय म्हणण्यापेक्षा ऋतुचक्र नव्यानं रिस्टार्ट झालंय असं वाटायची परिस्थिती आली आहे. आधी वळीव, वादळी पाऊस, विजा आणि मग मॉन्सून आणि त्याची स्थित्यंतरं. पण यंदा आता पुन्हा वादळी पाऊस, विजा कडकडायला सुरूवात झाली आहे. ही गंमत आहे.
लहानपणी सारखं वाटायचं की पाऊस रात्री पडायला पाहिजे. दिवसा ऊन. मस्त खेळायला मिळायला पाहिजे. मग रात्री पडू दे पडायचा तेवढा. पण आजूबाजूची मोठी माणसं दटावायची. म्हणायची, ‘नको रे बाबा. रात्रीचा पाऊस एवढा नको.’
संगमेश्वरला १९८२ ला राहायला गेलो. एवढा पाऊस पहिल्यांदाच बघितलेला. त्यामुळं घाबरायला व्हायचं. मुलं मात्र निवांत असायची. रात्रंदिवस पाऊस असायचा. एकदा सलग तीन-चार दिवस पाऊस पडला. सगळीकडंच पडत असावा असं रेडिओवरून, वर्तमानपत्रांमधून कळायचं. आमचे घरमालक, त्यांच्या आजूबाजूला राहणारी मंडळी रात्र झाली की काळजीत पडायची.
आम्ही साडेनऊलाच झोपून जायचो. असं एकदा झोपलो होतो आणि आईनं मला उठवलं. नदी दाखवते चल म्हणाली. आमच्या घरासमोर मोठं अंगण, त्याला पायऱ्या, त्याच्यासमोर रस्ता, भरपूर भातशेती आणि मग नदी. रात्रीच्यावेळी नदीपलिकडच्या रस्त्यावरून एखादी एस्.टी. गेली की ते दिवे जमिनीवर चमकले की समजायचे नदीनं पात्र सोडलंय. रात्रीचं तेवढंच नदीदर्शन. पण आई म्हणाली की नदी बघायला चल म्हणजे काय हे नव्हतं लक्षात आलं.
बाहेर आलो तर सगळी मंडळी अंगणात जमलेली. मधूनअधून टॉर्चचे झोत टाकून बघायचे तर चक्क पाणी चमकलं. मला आश्चर्य वाटलं. आतापर्यंत नदी घराजवळ आली नव्हती. असं पहिल्यांदाच घडत होतं. आम्ही राहत असलेल्या घराच्या पहिल्या पायरीला पाण्यानं स्पर्श केला. आमच्या घरमालकीण शैलाकाकूंनी नदीची पूजा केली. खणानारळानं ओटी भरली. तो सोहळा पार पडला. जीवनदायिनी म्हणून पूजा केली तरी शेवटी नदी ही नदी होती. वरून पाऊस कोसळत होता. आजपर्यंत इथपर्यंतही पाणी आलेलं नव्हतं. त्यामुळं भीती कमी होत नव्हती. सगळी मोठी मंडळी पाण्यावर नजर ठेवून होती. पाणी हळूहळू वाढत होतं. पहिल्या पायरीपासून चौथ्या पायरीपर्यंत पोहोचलं. घरात आवरासावरी सुरू झाली. वीज दोनचार दिवसांपूर्वीच गेली होती. त्यामुळं अंधारातच सामानसुमान सुरक्षित ठिकाणी ठेवलं जात होतं.
बराच काळ झाली तरी पाणी चौथ्या पायरीवरच घुटमळत राहिलं. वाढतही नव्हतं. कमीपण होत नव्हतं. आमच्या गावात शास्त्री आणि सोनवी अशा दोन नद्यांचा संगम होत होता. सोनवी शास्त्रीला मिळून पुढं खाडी बनून अरबी समुद्रात जाते. आमच्या घरी सोनवी आली होती. भरतीचं पाणी आत घुसलं होतं, ओहोटी लागली की पाणी ओसरेल असं मोठी माणसं म्हणत होती. आम्हाला काय? शाळा नाही, याचाच आनंद. आईबाबांनाही हा अनुभव नवाच होता.
पण सुदैवानं पाणी चौथ्या पायरीवर घुटमळलं आणि हळू हळू तिसऱ्या मग दुसऱ्या आणि मग वेगानं उतरलं. आम्ही मुलं झोपलो. सकाळी पाहिलं तर पाणी शेतात गेलं होतं. रस्ता तसाही कच्चाच होता. त्यामुळं त्यातल्या मातीत गाळाची भर पडली होती, एवढंच.
नदीची ओटी भरताना काकूंनी तिला विनंती केली होती की आज माझ्या घरी आलीस. माझ्या उंबऱ्याला पाय तुझे पाय लागले. मी धन्य झाले. पण माझ्या घराची वाताहत करू नकोस. नदीनं काकुंचं मागणं ऐकलं. ती परत फिरली.
पण प्रत्येकवेळी निसर्ग माणसाचं ऐकतोच असं नाही, याचा प्रत्यय आम्हाला लवकरच येणार होता.

(क्रमश:)

Thursday, September 19, 2019

खारीचा वाटा


आम्हाला या नव्या घरी राहायला येऊन चार वर्ष झाली जवळजवळ.
पुण्यासारख्या शहरात नव्या ठिकाणी राहायला गेलं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कामवाली बाई मिळणं. तुम्ही लाख शोधाल, पण तुम्हाला योग्य कामवाली मिळणं नशिबाचाच भाग असतो. आमच्या सुदैवानं आमच्याकडं नंदा आली. खरंतर, महानंदा नाव तिचं. कर्नाटकाच्या सीमेवरचं गाव तिचं. पोटापाण्यासाठी घरची शेतीभाती असतानादेखील हे कुटुंब इकडं आलं. तशी बरीच कुटुंब आलीत इथं. तिचा नवरा मारुती आमच्या सोसायटीतली असंख्य छोटीमोठी कामं करतो. कमी शिक्षणाचा शाप असला तरी सुदैवाने अशिक्षितपणाबरोबर येणारी व्यसनाची कीड या कुटुंबात आली नाही. यांना तीन मुलं. दोन मुलींवर तिसरा मुलगा – प्रज्ज्वल किंवा प्रेम. आम्ही राहायला गेलो तेव्हा हा नुकताच चालायला लागला होता. कधीकधी ती घेऊन येते मुलांना. थोरली भाग्यश्री खूप हुशार आणि कामसू. म्हटलं तर सगळंच छान. अगदी छोटं नाही तरी छोटेखानी कुटुंब. दोघंही नवराबायको अफाट कष्ट करतात. पुण्यासारख्या ठिकाणी घर चालवायला, मुलाबाळांची हौस भागवायला व्यवस्थित पैसे मिळवतात. थोडंफार सोनंही करतात.
पण हे सगळं भूतकाळात गेलंय. म्हणजे अगदी नजिकच्या एखाद्या वर्षामागच्या भूतकाळात. किराणा सामानच्या यादीत डाळ, तांदूळ, तेल अशा पदार्थांबरोबर औषधांची भर पडली. लहानग्या प्रेमला अन्न पचेना. ताप उतरेना. जवळच्या डॉक्टरांना दाखवलं. गोळ्या औषधं घेतली. तात्पुरतं बरं वाटायचं. पण पुन्हा तीच गत. नंदा-मारूतीच्या कामावर दांड्या पडायला लागल्या. सुदैवानं त्यांच्या गोड स्वभावामुळं कामाच्या ठिकाणची माणसं ‘माणसं’ होती. त्यामुळं निभावून जायचं. एका डॉक्टरच्या औषधांनी उपाय पडेना म्हणून दुसरा डॉक्टर, मग तिसरा. कधी या टेस्ट, त्या टेस्ट. पृथ्वीवरचे उपाय थकले की आकाशात उत्तरं शोधली जातात. इथं गरीब-श्रीमंत, अशिक्षित-सुशिक्षित, ग्रामीण-शहरी असं काहीच नसतं. पोटच्या पोरांसाठी माणसं कुठल्याही थराला जातात. या दोघांनीही कुणी सांगितलं म्हणून हा नवस, कुणी बोललं म्हणून तिथल्या देवाला साकडं घाल, हे सगळं केलं.
प्रेम मधून अधून यायचा आमच्याकडं. माझ्या मुलाची गाडी घेऊन खेळायचा. मनात आलं तर काही खायचा. बऱ्याचदा नकोच म्हणायचा. एवढं गोड पोरगं. वरनं पाहिलं तर कळतही नाही की त्याच्या इवल्याशा शरीरात नेमकं कुठं काय चुकतंय. पण आता इलाज नव्हता. आवाक्यातल्या सगळ्या उपचारांनी हात टेकले होते. मोठ्या दवाखान्यात दाखवावंच लागणार होतं. त्यातही जिथं परवडेल अशाच हॉस्पिटलपासून सुरूवात केली. नाही म्हटलं तरी आपल्यालाही मोठ्या दवाखान्याची भीतीच असते. पण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्याच्या आवश्यक त्या टेस्टस् केल्या, आधीच्या तपासण्यांचे निकाल पाहिले. मग निदान केलं. या एवढ्याशा प्रेमला भलामोठ्या आजारानं ग्रासलंय. डॉक्टरांनी निदान केलं कॅन्सर म्हणून. ब्लड कॅन्सर.
त्यालाच का? याला काहीच उत्तर नाही. आईबापाच्या डोळ्याचं पाणी थांबत नाही. पाचवीतली भाग्यश्री अचानक मोठी झाल्यासारखी वाटते. मधली प्रियांका. तिला बालपणच नाही. आणि ते एवढंस पिल्लू, प्रेम. त्याला आपण आजारी पडतो. त्यामुळं शाळेत जायला मिळत नाही. एवढंच कळतंय.
बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा दहा लाख खर्च आहे. हॉस्पिटलचं कोटेशन इथं देतोय. यातही विशिष्ट शासकीय सवलतीत ही केस बसत नाही, असं हॉस्पिटलचं म्हणणं आहे. माझ्या सोसायटीतली काही मंडळी जिथून शक्य आहे, तिथून निधी उभा करण्याचा प्रयत्न करताहेत. ही ट्रीटमेंट संपूर्ण वर्षभर चालणार आहे. आम्ही काही जणांनी थोडेफार पैसे जमा केलेत. पण ते अर्थातच अपुरे आहेत. मला माहिती आहे, की एवढे सगळे पैसे एकाच ठिकाणी एका वेळी जमणं केवळ अशक्य आहे. पण प्रत्येकानं थोडाथोडा वाटा उचलला तर कदाचित हे शक्य आहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या अकाऊंटलाच पैसे जमा करायचे आहेत. बघा. जमलं तर आपण मिळून त्या प्रज्ज्वलला आणि या कुटुंबाला पुन्हा हसतंखेळतं राहायला मदत करू शकतो. विनंती आहे.

Monday, September 9, 2019

मुक्काम

पुन्हा दिलीप आला होता. काम काहीच नाही. बोलणंही फार काही नाही. उगीच आपला डोकावून जातो, तसा आला होता. त्याच्या मनात असलं की येतो. खरंतर माझ्या मनात असलं की येत असावा.
नेहमीसारखा पांढरा शर्ट, खाकी चड्डी घालून. बऱ्याचदा त्याच वेषात त्याला बघितलंय. कधी कधी धमक पिवळा शर्टसुद्धा असतो. पण त्याच्यावरही खाकी चड्डीच. तेव्हाही त्याच्याकडं एवढे दोनच कपडे होते. किंवा मला तरी तसं वाटायचं. पिवळ्या रंगाचा त्याचा तो शर्ट त्यानं एकदाच घातला होता. आमची सहल गेली होती त्यादिवशी. एरवी पांढराच.
इयत्ता दुसरी ते सातवी एवढी वर्षं आम्ही एकत्र होतो. म्हणजे एका वर्गात. त्यातही सातवी इयत्ता काही त्यानं पूर्ण केलीच नाही. मध्येच सोडून गेला. म्हणजे जेमतेम साडेचार वर्षांची मैत्री. संगमेश्वरला प्राथमिक शाळा म्हणजे जिल्हा परिषदेचीच. केंद्र शाळा नं. २. तिथंच हा दिलीप मला भेटला. दिलीप माने. पहिली दोन वर्षे काही फार मैत्री नव्हती. नुसताच परिचय. मैत्री चौथीपासून सुरू झाली. माझे वडिल शिक्षक त्यामुळं माझ्यावर उगीचच हुशार असण्याचा आरोप होता. दिलीप हुशार होता. तेव्हा नंबरचं खूप खूळ होतं. दिलीप पहिल्या तीनात असायचा. मी, दिलीप, अभिजीत, मंदार. आलटून पालटून त्यात हजेरी लावायचो. दिलीप आणि मंदार माझ्या घरी कधीकधी अभ्यासाला यायचे. त्यात सगळंच आलं अभ्यास, खेळ, गप्पा. मंदारच्या घरी मी खूप वेळा गेलो. पण दिलीपच्या घरी एकदाही नाही. त्याच्या घराविषयी त्याच्याशी बोलण्यातूनच कळायचं.
हा दिलीप म्हणजे तीन बहिणींमध्ये एकटा भाऊ. म्हणून काही कोडकौतुक नाही. पण नाही म्हटलं तरी वेगळी वागणूक होतीच. वडिल पाथरवट. दगड फोडणारे. आईही तेच काम करायची. विजापूर किंवा तिकडंच कुठंतरी मूळ गाव होतं. तिथून पोटापाण्यासाठी कोकणातल्या खेड्यात आलेले. कधीतरी फार पूर्वी आले असावेत. तेवढं आता मला आठवत नाही. पण हा गडी सुरूवातीपासून याच शाळेत असायचा. काळाकभिन्न. त्याच्या वडिलांना आणि काकाला बघितलं होतं. तेही दोघं असेच. पण त्यांचा काळा वर्ण वेगळाच. विठ्ठलासारखा काळा. त्वचा तकतकीत. पॉलिश केल्यासारखी.
अशिक्षितपणा आणि जोडीला गरीबी. त्यातनं येणारी निराशा, अपमान, अवहेलना त्याचे वडिल दारूत बुडवून गिळायचे. मेंदूवरचा ताबा सुटला की मग कुटुंबावर हात उगारला जायचा. कधीमधी दिलीपवरही पडायचा. पण त्याला त्याचं विशेष काही वाटायचं नाही. त्यावेळी कुठल्याच लहान मुलाला माराचं काही वाटायचं नाही. एकदम सामान्य गोष्ट होती. तरी याही परिस्थितीत त्याच्यासमोर आदर्श होता त्याचा काका. त्याचा हा काका माझ्या वडिलांचा विद्यार्थी. तो एस्.टी. मध्ये कंडक्टर म्हणून नोकरीला लागला. दिलीपला त्याच्यासारखं व्हायचं होतं. तसंही माझ्या लहानपणी कुणालाच अंतराळवीर वगैरे व्हायची स्वप्न पडत नसत. डॉक्टर इंजिनिअर नाहीतर बँक. पण याला काही होण्यापेक्षा कमावून घरातलं दारिद्र्य, दुःख घालवायची घाई होती. त्याच्या पायात चपलाही नसायच्या. त्याची स्वप्नं काय वेगळी असणार होती?
माझ्या आईला तो सांगायचा की मी खूप शिकणार आहे. लवकर कमवायला लागणार आहे. बहिणींची लग्न करायचीत. पत्र्याच्या खोलीत सहा-सात जणांचं कुटुंब राहायचं. त्यात हा अभ्यास करायचा. रॉकेलचा दिवाच असायचा बहुतेक. नक्की आठवत नाही. अशात अभ्यास करून पाचवीत त्याला आणि मला विभागून पहिला क्रमांक मिळाला. माझे बाबा मला म्हणाले होते की कोण आहे हा दिलीप माने. मी त्याला बक्षीस देणार आहे. खरं सांगतो, खूप वाईट वाटलं होतं. पूर्णपणे प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून मुलगा आपल्याबरोबरीनं पहिला नंबर मिळवतो म्हणजे काय? मित्रच होता माझा. पण तरी खूप राग आला होता.
तरी बऱ्याचदा एकत्र अभ्यास करायचोच. कुठल्या कुठल्या परीक्षा द्यायचो. आपल्या घरची बरी परिस्थिती आहे. त्याची अजिबात नाही. तो पुस्तकं कशी आणत असेल. शाळेत एखाद्या परीक्षेची फी कशी भरत असेल. एवढा विचार करण्याचं वयं नव्हतं. समजही नव्हती. कधी आजारी पडला तर सरकारी दवाखान्यातून औषध आणून पुन्हा कामाला लागायचे लोक. तसाच हा पण.
सातवीत गेल्यावर काही दिवसांनी दिलीप मधनंअधनं गैरहजर असायचा. सारखा आजारी पडायचा. तसंही कोकणातल्या पावसात मुलं गैरहजर राहायचं प्रमाण वाढायचंच. पण दिलीपला माझ्यासारखी दांड्या मारायचा छंद नव्हता. त्याला शाळेत यायला मनापासून आवडायचं. पण पावसाळा संपला तरी त्याचं आजारपण असायचंच. त्याला खोकला झाला. कमीच होईना. आमचा अभिजीत बातमी घेऊन आला की दिलीपला उपचारांसाठी मिरजेला घेऊन गेलेत, मिशन हॉस्पिटलमध्ये. त्याला टीबी झाला होता. टीबी झाला की मिशन हॉस्पिटल, मिरज इथं नेतात असं मला वाटायचं. कारण आमच्या जवळच्या एकाला तिथं नेलं होतं. त्याचा टीबी पूर्ण बरा झाला.
मला आठवलं की कधी कधी तास सुरू असतानाही तो खोकायचा. मुलांना आपला त्रास होऊ नये म्हणून मागच्या बाकावर बसायचा. तोंड दाबून खोकायचा. एकदा असाच खोकल्याची उबळ आली. तोंड दाबून खोकताना चित्रविचित्र आवाज आले. आमच्या वर्गावर तेव्हा ऑफ तासावर एक सर बदलून आले होते. ते सरही शाळेत नवे होते. विचित्र आवाज ऐकून मुलं हसायला लागली. सरांना वाटलं की हा मुद्दाम करतोय. म्हणून त्यांनी त्याच्या पाठीत गुद्दा घातला. तो कळवळला. सगळा वर्ग एकदम शांत झाला. सुन्न झाला होता बहुतेक.
बरेच दिवस मध्ये गेले. कधीमधी दिलीपविषयी कळायचं. प्रकृतीत सुधारणा आहे असं समजायचं. बरं वाटायचं.
तेव्हा संगमेश्वरला घरासमोर मोठं अंगण होतं. संध्याकाळी तिथंच मुक्काम. बाबा शेजारच्या सप्रे काकांशी गप्पा मारत होते. आम्ही मुलंही तिथंच होतो. आमच्याही काहीतरी गप्पा सुरू होत्या. खूप वाजले नव्हते. पण अंधार पडला होता. हळूहळू गप्पांमधला माझा सहभाग कमी झाला. मलापण कळलं नाही. लांब कुठंतरी अंधारात पाहत होतो बहुतेक आणि माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. हळूहळू मी हुंदके द्यायला लागलो. सगळ्यांच्याच लक्षात आलं ते. बाबांनी मला जवळ घेतलं. समजावत राहिले. सांगितलं की दिलीप बरा होऊन येईल परत खेळायला. पण माझं रडू कमीच येईना.
दुसऱ्या दिवशी बातमी आली की आमचा दिलीप माने आम्हाला सोडून गेला. टीबीनं त्याचा घात केला. सुरूवातीला उपचार झाले नाहीत किंवा देवदेवस्कीचे उपचार झाले बहुतेक. त्यामुळं मिरजेला न्यायला उशीर झाला. बरेच काही काही ऐकायला मिळालं. कारण काहीही असो. दिलीप आम्हाला भेटणार नव्हता. शेवटचा कधी भेटला तेही आठवत नाही. त्याचा व्यवस्थित निरोप घेतला का तेही लक्षात नव्हतं. बहुतेक पांढरा शर्ट खाकी चड्डीमध्येच भेटला होता तो शेवटचा.
आदले दिवशी जेव्हा मी हुंदके देऊन रडत होतो, तेव्हाच तिकडं त्याचं जीवन संपलं होतं.
माझी आजी गेली तेव्हा मी दुसरीच होतो. तेव्हा तो आघात फार काही जाणवला नसावा. कुणी जातं म्हणजे काय होतं हे फारसं कळलंच नव्हतं. तोपर्यंत जाणं म्हणजे नक्की काय होतं हे जरी माहित नव्हतं तरी हे नक्की माहित होतं की दिलीप गेला म्हणजे तो कधीच कुणालाच हाडामांसाचा म्हणून दिसणार नव्हता. त्याचं शरीर चालवणारी ऊर्जा संपली. तो गेला.
तर तेव्हापासून हा मधूनअधून मला ढोसतो. काय माहित? पण तो आठवला नाही असे सलग काही महिने गेलेत असं काही झालं नाही. काही ना काही कारणाने असेल किंवा काहीच कारण नसेल. पण दिलीप असा मधून अधून डोळ्यासमोर येतोच. तो तसा निघून गेला. त्याचा एक फोटो अभिजीत घेऊन आला. आम्ही वर्गणी काढून फ्रेम केला. आमच्या सातवीच्या वर्गात होता तो. आताचं माहिती नाही. पण मला दिलीप जसाच्या तसा आठवतो. तेव्हा तो गेला म्हणतात. कदाचित तो मनातून कधीच गेला नसेल. मुक्काम असेल. येईल परत थोड्या दिवसांनी. कदाचित आजसुद्धा.