Friday, September 27, 2019

रात्रीचा पाऊस – भाग २

नदीला पूर येतो म्हणजे नेमकं काय होतं हे मला १९८२ साली कळलं. तोपर्यंत मला आपली नदी माहित होती. पुलावरून गाडी जायला लागली की नदी दिसते. तिला नमस्कार करायचा कारण ती पाणी देते आपल्याला. तेवढाच नदीचा माझा संबंध. संगमेश्वरला गेल्यावर नदी रोजच भेटायला लागली. पुलावरूनच. पण आता आम्ही चालत जायचो पुलावरून. त्यामुळं येताजाता नदी दिसायचीच. पावसाळा असल्यामुळं कधीकधी पात्रातून बाहेर यायची. तेव्हाही आमच्या पायऱ्यांपर्यंत आली ती अशी रौद्र वगैरे नाही वाटली. त्यातही रात्र असल्यामुळं ती भीषणता जाणवली नसेल. आणि आमच्या घरात जरी आली नाही, तरी संगमेश्वरच्या बाजारपेठेत पाणी शिरलं होतं. अगदी रस्त्यालगतच्या दुकानांमध्ये पाणी शिरलं होतं. पण तो पहिला पुराचा अनुभव. रात्रीच्या पावसानं आणलेला रात्रीचा पूर.


त्यावर्षी परत काही पाणी आलं नाही. पुढचा पावसाळा १९८३ सालचा. आता पावसाळ्याची थोडी सवय झाली होती. आणि त्या वेळेपर्यंत तरी ऋतुचक्र इमानदारीत चालायचं. म्हणजे मेमध्ये वळीव, साधारण सात जूनच्या आसपास पहिला पाऊस, पेरणी, मृगाचे मखमली किडे, थोडा जास्त पाऊस, भातलावणी, मुसळधार, चिखल, हिरवे डोंगर, त्यातले धबधबे, मध्येच उघडीप, श्रावणातला पाऊस, मग असा पडत पडत सप्टेंबरपर्यंत संपायचा. मग थंडी, उन्हाळा, पुन्हा पाऊस. पावसाळ्याच्या सुरूवातीच्या दिवसात बिरंबोळे यायचे. छोटंसं रोपटं. पानावरून ओळखायचं. त्याची मुळं व्यवस्थित खणून काढायची. तो बिरंबोळा. साल काढायची आणि खायचा. साधारण कुठलंही कंदमूळ चवीला लागतं तशीच याची चव असायची. मोठी मुलं म्हणायची की व्यवस्थित खणलं नाही तर मुळांचं पाणी होतं. सुरूवातीला खरं वाटायचं. एकदा बिरंबोळा खणताना रोपटं तुटलं. तरी मी खणून मूळ बाहेर काढलं. तेव्हा कळलं की असं काही नसतं. कदाचित रोप तुटलं तर नेमक्या मुळापर्यंत पोचता येणार नाही म्हणून ती धमकी असावी. आपल्या व्यवहारातही बऱ्याचदा आपल्याला अशा धमक्या ऐकायला मिळतात. तसाच हाही प्रकार.
तर त्यावर्षीसुद्धा आमचे पावसाळी उद्योग सुरू होते. पुरेसा पाऊस सुरू झाला असावा कारण पऱ्ह्या पूर्ण वेगाने वाहू लागला होता. तेव्हा आम्हाला प्यायचं पाणी म्हणजे विहीरीचं. पावसाळ्यात मोटर बंद. मग रहाटानं ओढायचं. ते काम आईला बरोबर जमायचं. मीही शिकायचा प्रयत्न करत होतो. पण काढणीला जोर पोचायचा नाही. आमचे घरमालक खूपच प्रगतीशील होते. प्लॉटच्या चढऊताराचा व्यवस्थित उपयोग करत उंचावर पाण्याची टाकी बनवली होती. पावसाळ्याच्या दिवसात डोंगरातल्या जिवंत झऱ्यांमधून पन्हाळीतून पाणी टाकीत पडायचं पन्हाळीसाठी घरच्याच पोफळीचा वापर केलेला. पावसाळा संपला आणि हे पाणी आटलं की मग विहीराला पंप बसवायचा आणि ते पाणी टाकीत आणायचं ते वापरायचं पाणी. प्यायचं मात्र थेट विहीरीतून भरायचं. पावसाळ्यात विहीर वरपर्यंत यायची. तरी तळ दिसायचा. कासवं फिरायची.
जुलैमध्ये नेमहीप्रमाणे पावसाचा जोर वाढला होता. वीज जायचं प्रमाणही वाढलं. म्हणजे सगळं नेहमीप्रमाणं होतं. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस थांबला नव्हता. साधरण पाचसहा दिवस सुरूच. बर कोकणातला पाऊस पूर्ण क्षमतेनं पडू लागला की साधारण पाच फुटावरचं दिसणं मुश्किल. तसाच तो सलग पडत होता. दिवसा पाऊस, रात्री पाऊस. निरनिराळ्या गावांमधल्या पुराच्या बातम्या यायला लागल्या होत्या. नदीनं पात्र ओलांडलं होतं. पण एकदोन दिवस तिचा शेतातच मुक्काम पडला होता.
२७ जुलैला असाच दिवसभर कोसळला. तोपर्यंत व्यवहार सुरू होते. पण कमी प्रमाणात. मागच्या वर्षीच्या पुरामुळे गावातल्या लोकांना नाही म्हटलं तरी एक शंका होतीच. रात्र होईपर्यंत नदी शेतातून रस्त्यापर्यंत आली होती. अंधार पडल्यावर नदीत टॉर्चचे झोत चमकत होते. पाणी बऱ्यापैकी वाढलं होतं. मोठी मंड मंडळी खुर्च्या टाकून पाण्यावर नजर ठेवून होते. आधीच्या अनुभवानुसार सामानसुमान उंचावर ठेवायची तयारी होती. घरमालकांचं घर दुमजली होतं. तिथं त्यांनी काही सामान हलवलं होतं. हळूहळू पाणी पहिल्या पायरीपर्यंत आलं. मागच्या वर्षीच्या आठवणी जाग्या झाल्या. तरी सगळे म्हणत होते की नाही येणार पाणी. मागच्या वर्षीचा अनुभव होताच. चौथ्या पायरीपर्यंत पाणी आल्यावर काकूंनी ओटी भरली. नदीला रक्षा कर म्हणून साकडं घातलं.
त्या रात्री बाबांचे खास मित्र शेटेकाका आमच्याकडं आले होते. पाण्याची एकंदर स्थिती पाहता आईबाबांनी त्यांना आग्रह केला की इथंच थांबा. कारण पाण्याचं काही खरं नाही. तुम्ही इतक्या लांब रात्रीचे पाण्यातून कसं जाणार. पण काकांनी ऐकलं नाही. पाणी वाढायला लागलं तसं बाबांना ती काळजी लागून राहिली की हे व्यवस्थित पोचले असतील का. कुठं अडकले तर काय करायचं? आख्ख्या गावात फारतर पंचवीस फोन. त्यातले वीस दुकानांमध्येच. ती पाण्याखाली. आणि फोन तर करायचा कुठून? विचारणार तर कसं आणि कोणाला?
पुढं रात्री एकदोन वाजता कधीतरी नदीनं काकूंचं ऐकलं. पाणी माघारी जाऊ लागलं. आम्ही मुलं माडीवरच झोपलो होतो. आम्हाला काहीच माहिती नव्हतं. पहाटेच्या सुमारास अचानक गोंधळ सुरू झाला. बोलण्याच्या आवाजानं आम्ही उठलो. नदीनं हुलकावणी दिली होती. पाणी आमच्या अंगणात येऊन पोचलं होतं.
आमच्या घरमालकांचं रेशनचं दुकान होतं बाजारपेठेत. ते आणि त्यांचा मोठा मुलगा, भैया, दुकानातला माल सुरक्षित हलवायला गेले होते. इकडं घरी बाबा आणि अजून एक भाडेकरू. तेवढीच पुरूष माणसं. घरमालकांची गाईगुरं होती. गुरं मोकळी सोडली नाहीत तर हकनाक मरणार. बाबांना त्या कामाचा काडीचा अनुभव नाही. पण त्यांनी कसंबसं ती दावी कापली. गुरांना मोकळं केलं. पाणी वाढतंच होतं. तोपर्यंत दादा, आमचे घरमालक आणि भैया दोघंही आले. सोनवी पुलावर छातीभर पाणी होतं. त्यातनं चालत ते आले.

पाणी घराच्या पायरीला लागेपर्यंत सकाळ उजाडली. २८ जुलै. आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस. त्याचदिवशी संकष्टीपण होती. मुलं सोडल्यास सगळ्यांचेच उपवास. आम्ही वरच्या मजल्यावर बसून हे सगळं पाहत होतो. सर्वांना अजूनही विश्वास होत की याच्यापुढं पाणी यायचं नाही. आम्हाला खाली यायला बंदी होती. चहा झाला. त्यानंतर पंधरावीस मिनिटांत पाणी घरात घुसलं. आजपर्यंत जे घडलं नव्हतं ते त्या वर्षी झालं. गावकऱ्यांची आई, जीवनदायिनी सोनवी नदी, त्यांची खुशाली विचारायला त्यांच्या उंबऱ्यापार आली.
आता मात्र मोठ्यांनी निर्णय घेतला. मुलांना आधी हलवायचं. आमच्या घराशेजारीच चाळ होती. तिथं चार कुटुंबं राहायची. माझे दोन मित्र तिथं राहायचे. आमच्या घराशेजारी वाहणारा पऱ्ह्या होता, त्यानंही पात्र सोडलं. त्याचं पाणी दुसऱ्या बाजूनं घरात घुसलं. आता तिथं थांबून चालणार नव्हतं. पाऊस सुरू होताच. आमचे घरमालक, दादा, उंचापुरा धिप्पाड इसम. जसं शरीर तसंच काळीज.
घरात छातीभर पाणी. डबे भांडी तरंगताहेत. एका खांद्यावर मी आणि दुसऱ्या खांद्यावर त्यांचा मुलगा, शैलेश. त्यांनी आम्हाला सांगितलं की दोन गोष्टी करायच्या. एक म्हणजे दार आलं की खाली वाकायचं आणि दुसरं पाण्यामुळं दार मिटलं जाणार नाही याची काळजी घ्यायची. आम्हाला दोघांना मजा वाटत होती. दार दिसलं की आम्ही जोरात ओरडून एकमेकांना सांगायचो. खाली वाकून दार उघडून धरायचं. दादा त्यातून पुढं जायचे. अशी तीन दारं पार केली. परसात आलो. पाऊस होताच. मध्येच एक गटार होतं. आम्हाला साधारण त्याची जागा माहित होती. गटार पाण्याखाली गेलेली. दादांना भीती ही की जर त्यांचा पाय पाण्यात गेला तर आम्ही पाण्यात पडणार. अंदाज घेत घेत त्यांनी गटार ओलांडली. आम्हाला सुरक्षित जागी सोडलं. नंतर माझ्या दोन्ही मित्रांना त्यांनी याच पद्धतीनं तिथं आणलं. तोपर्यंत भैयानं गायीच्या वासराला लहान बाळासारखं हातात धरून आणलं. यंदाच्या पुरात अशा दृष्यांचे फोटो पाहिल्यावर दादा आणि भैयाच दिसले मला तिथं.
कोकणातले संडास पऱ्ह्याकाठी असतात. आमचा थोडा उंच होता. आमची सुरक्षित जागा. मुलांना आतमध्ये ठेवलं आमच्या आया छत्री घेऊन बाहेर. पुरूष मंडळी एकेकाला तिथं आणून सोडत होते.
पाणी कमी होत नव्हतं. कधी होणार माहित नव्हतं. तिथंच थांबून उपासमारीचीच शक्यता. पुरस्थिताच कसा सामना करायचा कुणालाच माहिती नव्हती. आमच्या घरातले आणि जवळच्या चाळीतले आठ कुटुंबातले साधारण तीस-पस्तीस लोक. एवढे सगळे जण जाणार कुठं. घराच्या पुढच्या बाजूला नदीचे पाणी. एका बाजूला पऱ्ह्या आणि पाठीमागं डोंगर. शेवटी असं ठरलं की डोंगरातून वाट काढत काढत जायचं. आमच्या माभळ्यातली (आम्ही राहत होतो त्या भागाचं नाव) काही घरं उंचावर होती. त्यांच्यापैकी एका ठिकाणी तरी पोचलं पाहिजे. त्यासाठी डोंगरातून जायचं. पावसाळ्यात आम्ही शक्यतो डोंगरात जात नव्हतो. उन्हाळ्यात जायचो. करवंदासाठी. आता त्या डोंगराच्या निसरड्या वाटेतून जायला लागणार होतं. चप्पल नव्हत्याच पायात. जीव तर वाचवायला हवा.

(क्रमश:)

Thursday, September 26, 2019

रात्रीचा पाऊस – भाग १

‘बा पावसा.. इथं पडतोयंस.. तसा माझ्या महाराष्ट्रात जा.. तिथं तुझी गरज आहे. शेतकरी तुझी वाट पाहतोय. जा तिकडे पड.. जा’ साधारण अशाच आशयाचं काहीतरी आपल्या केदार जाधवनं इंग्लंडच्या पावसाला सांगितलं. महाकवि कालिदासांनी मेघाला दूत बनवून आपल्या सखीकडं पाठवलं. तसंच या पठ्ठ्यानं थेट पावसाला साता समुद्रापारहून आमच्याकडं पाठवलं. जुलै आला तरी पाऊस पडत नव्हता. पाऊस न पडण्याची कारणं वेगळी तशी प्रत्येकाच्या काळज्यासुद्धा वेगवेगळ्या होत्या. दुष्काळ पडला तर सत्ताधाऱ्यांना चिंता की येत्या निवडणुकीत मतदारांना तोंड देताना नवं गाजर शोधावं लागेल. पाऊस पडला, सुगी झाली तर विरोधकांना चिंता की यांच्यावर गोळीबार करायसाठी नवं कारण शोधावं लागेल. माझ्यासारख्याला पिण्याच्या पाण्याचा चिंता आणि शेतकऱ्याला अर्थातच जगण्याची चिंता. तर या सगळ्या चिंतांना केदार जाधवच्या ढगांनी पार धुवून काढलं. भरपूर पाऊस झाला. आमच्या कोल्हापूरात म्हणतात तसा बद्द्या पाऊस पडला.
आता सप्टेंबर संपत आला तरी पाऊस मुक्काम हलवत नाही, म्हटल्यावर मंडळींची जरा कालवाकालव सुरू झाली. पावसाला आतुरतेनं वगैरे वाट पाहणारी, पहिल्या सरीनंतर एकूण हंगामाच्या सरासरीपेक्षा जास्त कविता पाडणारी, उगाच वाफाळणारे चहाचे कप, कांदाभजी, भाजलेली कणसं, पावसात भिजलेल्या अगडबंब देहांचे फोटोबिटो यांचा पाऊस फेसबुकवर पाडणाऱ्या मंडळींचं पावसानं कवित्वाला धुमारे फुटायचे बंद झालेत. ‘आता पुरे यार..’ ‘कंटाळा आला राव’ ‘बास आता पाऊस’ अशा कमेंट्स जागोजागी ऐकू यायला लागलेत. दिवाळी करूनच जातो बहुतेक वगैरे, पावसावर विनोद सुरू झालेत आता.

लहानपण कोकणात गेल्यामुळं पुण्यातल्या पावसाची भीती वगैरे कधी वाटलीच नाही. आठ दिवस पाऊस थांबत नाही, दहा-पंधरा दिवस सूर्य दिसत नाही, सतत २४ तास घराशेजारून धबधब्यासारखा कोसळणारा पऱ्ह्या (ओढा), त्याचा आवाज, नदीकडं लक्ष ठेवून कामं करायची. घरातून नदी दिसली की शाळेला दांडी. कारण शाळेच्या रस्त्यात नक्की तिचं पाणी आलेलं असणार. तीच गोष्ट शाळेत असतानाची. ग्राऊंडच्या पलिकडं नदीपात्रात चहासारखी नदी वर डोकावू लागली की शाळा सोडून द्यायचे. आम्ही गावात राहायचो. पण वाडीत जाणाऱ्या मुलांना डोंगर, दरी, पऱ्हे ओलांडून ये-जा करायला लागायची. ती मुलं बऱ्याचदा शाळेत यायचीच नाहीत. आली तरी त्यांना लवकर सोडायचे. रेनकोट, छत्री अशा गोष्टी पावसापासून बचाव करायसाठी म्हणून बाजारात मिळायची. त्या आम्ही वापरायचोपण. फक्त शाळेत जाईपर्यंत स्वत:चे कपडे कोरडे ठेवायचे. येताना भिजायचं. म्हणजे आपल्याला फार काही करायला लागत नसायचं. आपण भिजायचोच. पण सगळ्यांनाच सगळ्याची सवय झालेली.
माझी आई तर अशा पावसात पळतपळत जाऊन बस पकडायची. तिथून अर्धाएक तासाचा प्रवास करून एका छोट्या गावात पोहोचायची. तिथून छोटासा डोंगर उतरायचा. भातखाचरांच्या बांधावरून किलोमीटरभर चालायचं. एकावेळी एकच माणूस. साधारण १०-१५ माणसांची रांग लागायची. मग समोर शंभरएक मीटरची खाडी. गढुळलेलं पाणी समुद्राकडं चाललेलं. तिथं गुडघाभर चिखलातून काही पावलं चाललं की मग होडक्यात बसायचं. पावसाळा नसताना याच पात्राची रूंदी निम्म्यानं कमी व्हायची. वेगही एवढा नसायचा. मग होडीला एक इंजिन बसवलेलं असायचं. तेव्हा त्या होडक्याला डिबको म्हणायचं. त्याचं कारण अजूनही कळलेलं नाही मला. पण पावसाळ्यात ही होडी किंवा तर. आपल्याला नदीपलिकडं जिथं पोहोचायचंय त्यापासून प्रवाहाच्या विरूद्ध बाजूला एक किलोमीटरभर होडी पाण्यात लोटायची. पन्नासएक फूट बांबूने प्रवाहात भरकटण्यापासून वाचवायचा प्रयत्न करायचा. दुसरा एकजण वल्ह्यानं होडीला दिशा द्यायचा. एवढं सगळं झाल्यावर ती होडी पलिकडं पोहोचली की पुन्हा चिखल तुडवायचा. छोटीशी चढण चढायची. वरून पाणी दुडदुडत यायचं. ते तुमची वाट अडवणार. त्यात पुन्हा पाय घसरायची भीती होतीच. एका हातात छत्री, दुसऱ्या हातानं साडी थोडी वर उचलायची. खांद्यावर पर्स. असं शाळेत जायचं. तिथंही पावसापाण्यातून जेवढी मुलं आली आहेत, त्यांना शिकवायचं. संध्याकाळी पुन्हा उलट्या क्रमानं घरी पोचायचं. बस चुकली तर पुढची बस एकदीड तासानंतरची, तीही पावसापाण्यातून वेळेत आली तर. म्हणजे रोज साडेसहाला घरी यायची ती अशावेळी साडेआठ वाजायचे. मी आणि बाबा स्टँडवर जायचो तिला आणायला. गावात सामसूम झालेली असायची. मुंबई-गोवा हायवेचं गाव असल्यामुळं एस.स्टँडवर दहावीस माणसं, एखादी रिक्षा, वडापावच्या दोन गाड्या, एक भुर्जीपाववाला. मग ही गाडी आली की गाडीतनं उतरलेल्या दहापंधरा माणसांची त्यात भर पडायची. पुन्हा सामसूम. माझ्या आईबरोबर खातूकाकू आणि त्यांचे पती खातूसर, पराडकर सर अशी मंडळी असायची म्हणून तेवढाच आधार. तीही मंडळी इतक्याच अडचणीतून कामाच्या ठिकाणी जाऊन यायची. इतरही काही लोक वेगवेगळ्या गावांना कामानिमित्त अशाच परिस्थितीतून रोज जाऊन यायची.
त्यामुळं या सगळ्यासमोर पुण्यातला पाऊस अगदीच चिल्लर वाटायचा.

यंदा पाऊस खूप लांबलाय. सप्टेंबर महिन्यातसुद्धा एखादाच दिवस बिनपावसाचा गेला असेल. ते कसं आहे ना की आपण माणसांनी निसर्गाचे सगळे नियम वाकवायचे. पण निसर्गानं मात्र तेच करायचं जे आपल्याला हवंय. तीच गोष्ट यंदापण झाली आहे. पाऊस परतलाय म्हणण्यापेक्षा ऋतुचक्र नव्यानं रिस्टार्ट झालंय असं वाटायची परिस्थिती आली आहे. आधी वळीव, वादळी पाऊस, विजा आणि मग मॉन्सून आणि त्याची स्थित्यंतरं. पण यंदा आता पुन्हा वादळी पाऊस, विजा कडकडायला सुरूवात झाली आहे. ही गंमत आहे.
लहानपणी सारखं वाटायचं की पाऊस रात्री पडायला पाहिजे. दिवसा ऊन. मस्त खेळायला मिळायला पाहिजे. मग रात्री पडू दे पडायचा तेवढा. पण आजूबाजूची मोठी माणसं दटावायची. म्हणायची, ‘नको रे बाबा. रात्रीचा पाऊस एवढा नको.’
संगमेश्वरला १९८२ ला राहायला गेलो. एवढा पाऊस पहिल्यांदाच बघितलेला. त्यामुळं घाबरायला व्हायचं. मुलं मात्र निवांत असायची. रात्रंदिवस पाऊस असायचा. एकदा सलग तीन-चार दिवस पाऊस पडला. सगळीकडंच पडत असावा असं रेडिओवरून, वर्तमानपत्रांमधून कळायचं. आमचे घरमालक, त्यांच्या आजूबाजूला राहणारी मंडळी रात्र झाली की काळजीत पडायची.
आम्ही साडेनऊलाच झोपून जायचो. असं एकदा झोपलो होतो आणि आईनं मला उठवलं. नदी दाखवते चल म्हणाली. आमच्या घरासमोर मोठं अंगण, त्याला पायऱ्या, त्याच्यासमोर रस्ता, भरपूर भातशेती आणि मग नदी. रात्रीच्यावेळी नदीपलिकडच्या रस्त्यावरून एखादी एस्.टी. गेली की ते दिवे जमिनीवर चमकले की समजायचे नदीनं पात्र सोडलंय. रात्रीचं तेवढंच नदीदर्शन. पण आई म्हणाली की नदी बघायला चल म्हणजे काय हे नव्हतं लक्षात आलं.
बाहेर आलो तर सगळी मंडळी अंगणात जमलेली. मधूनअधून टॉर्चचे झोत टाकून बघायचे तर चक्क पाणी चमकलं. मला आश्चर्य वाटलं. आतापर्यंत नदी घराजवळ आली नव्हती. असं पहिल्यांदाच घडत होतं. आम्ही राहत असलेल्या घराच्या पहिल्या पायरीला पाण्यानं स्पर्श केला. आमच्या घरमालकीण शैलाकाकूंनी नदीची पूजा केली. खणानारळानं ओटी भरली. तो सोहळा पार पडला. जीवनदायिनी म्हणून पूजा केली तरी शेवटी नदी ही नदी होती. वरून पाऊस कोसळत होता. आजपर्यंत इथपर्यंतही पाणी आलेलं नव्हतं. त्यामुळं भीती कमी होत नव्हती. सगळी मोठी मंडळी पाण्यावर नजर ठेवून होती. पाणी हळूहळू वाढत होतं. पहिल्या पायरीपासून चौथ्या पायरीपर्यंत पोहोचलं. घरात आवरासावरी सुरू झाली. वीज दोनचार दिवसांपूर्वीच गेली होती. त्यामुळं अंधारातच सामानसुमान सुरक्षित ठिकाणी ठेवलं जात होतं.
बराच काळ झाली तरी पाणी चौथ्या पायरीवरच घुटमळत राहिलं. वाढतही नव्हतं. कमीपण होत नव्हतं. आमच्या गावात शास्त्री आणि सोनवी अशा दोन नद्यांचा संगम होत होता. सोनवी शास्त्रीला मिळून पुढं खाडी बनून अरबी समुद्रात जाते. आमच्या घरी सोनवी आली होती. भरतीचं पाणी आत घुसलं होतं, ओहोटी लागली की पाणी ओसरेल असं मोठी माणसं म्हणत होती. आम्हाला काय? शाळा नाही, याचाच आनंद. आईबाबांनाही हा अनुभव नवाच होता.
पण सुदैवानं पाणी चौथ्या पायरीवर घुटमळलं आणि हळू हळू तिसऱ्या मग दुसऱ्या आणि मग वेगानं उतरलं. आम्ही मुलं झोपलो. सकाळी पाहिलं तर पाणी शेतात गेलं होतं. रस्ता तसाही कच्चाच होता. त्यामुळं त्यातल्या मातीत गाळाची भर पडली होती, एवढंच.
नदीची ओटी भरताना काकूंनी तिला विनंती केली होती की आज माझ्या घरी आलीस. माझ्या उंबऱ्याला पाय तुझे पाय लागले. मी धन्य झाले. पण माझ्या घराची वाताहत करू नकोस. नदीनं काकुंचं मागणं ऐकलं. ती परत फिरली.
पण प्रत्येकवेळी निसर्ग माणसाचं ऐकतोच असं नाही, याचा प्रत्यय आम्हाला लवकरच येणार होता.

(क्रमश:)

Thursday, September 19, 2019

खारीचा वाटा


आम्हाला या नव्या घरी राहायला येऊन चार वर्ष झाली जवळजवळ.
पुण्यासारख्या शहरात नव्या ठिकाणी राहायला गेलं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कामवाली बाई मिळणं. तुम्ही लाख शोधाल, पण तुम्हाला योग्य कामवाली मिळणं नशिबाचाच भाग असतो. आमच्या सुदैवानं आमच्याकडं नंदा आली. खरंतर, महानंदा नाव तिचं. कर्नाटकाच्या सीमेवरचं गाव तिचं. पोटापाण्यासाठी घरची शेतीभाती असतानादेखील हे कुटुंब इकडं आलं. तशी बरीच कुटुंब आलीत इथं. तिचा नवरा मारुती आमच्या सोसायटीतली असंख्य छोटीमोठी कामं करतो. कमी शिक्षणाचा शाप असला तरी सुदैवाने अशिक्षितपणाबरोबर येणारी व्यसनाची कीड या कुटुंबात आली नाही. यांना तीन मुलं. दोन मुलींवर तिसरा मुलगा – प्रज्ज्वल किंवा प्रेम. आम्ही राहायला गेलो तेव्हा हा नुकताच चालायला लागला होता. कधीकधी ती घेऊन येते मुलांना. थोरली भाग्यश्री खूप हुशार आणि कामसू. म्हटलं तर सगळंच छान. अगदी छोटं नाही तरी छोटेखानी कुटुंब. दोघंही नवराबायको अफाट कष्ट करतात. पुण्यासारख्या ठिकाणी घर चालवायला, मुलाबाळांची हौस भागवायला व्यवस्थित पैसे मिळवतात. थोडंफार सोनंही करतात.
पण हे सगळं भूतकाळात गेलंय. म्हणजे अगदी नजिकच्या एखाद्या वर्षामागच्या भूतकाळात. किराणा सामानच्या यादीत डाळ, तांदूळ, तेल अशा पदार्थांबरोबर औषधांची भर पडली. लहानग्या प्रेमला अन्न पचेना. ताप उतरेना. जवळच्या डॉक्टरांना दाखवलं. गोळ्या औषधं घेतली. तात्पुरतं बरं वाटायचं. पण पुन्हा तीच गत. नंदा-मारूतीच्या कामावर दांड्या पडायला लागल्या. सुदैवानं त्यांच्या गोड स्वभावामुळं कामाच्या ठिकाणची माणसं ‘माणसं’ होती. त्यामुळं निभावून जायचं. एका डॉक्टरच्या औषधांनी उपाय पडेना म्हणून दुसरा डॉक्टर, मग तिसरा. कधी या टेस्ट, त्या टेस्ट. पृथ्वीवरचे उपाय थकले की आकाशात उत्तरं शोधली जातात. इथं गरीब-श्रीमंत, अशिक्षित-सुशिक्षित, ग्रामीण-शहरी असं काहीच नसतं. पोटच्या पोरांसाठी माणसं कुठल्याही थराला जातात. या दोघांनीही कुणी सांगितलं म्हणून हा नवस, कुणी बोललं म्हणून तिथल्या देवाला साकडं घाल, हे सगळं केलं.
प्रेम मधून अधून यायचा आमच्याकडं. माझ्या मुलाची गाडी घेऊन खेळायचा. मनात आलं तर काही खायचा. बऱ्याचदा नकोच म्हणायचा. एवढं गोड पोरगं. वरनं पाहिलं तर कळतही नाही की त्याच्या इवल्याशा शरीरात नेमकं कुठं काय चुकतंय. पण आता इलाज नव्हता. आवाक्यातल्या सगळ्या उपचारांनी हात टेकले होते. मोठ्या दवाखान्यात दाखवावंच लागणार होतं. त्यातही जिथं परवडेल अशाच हॉस्पिटलपासून सुरूवात केली. नाही म्हटलं तरी आपल्यालाही मोठ्या दवाखान्याची भीतीच असते. पण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्याच्या आवश्यक त्या टेस्टस् केल्या, आधीच्या तपासण्यांचे निकाल पाहिले. मग निदान केलं. या एवढ्याशा प्रेमला भलामोठ्या आजारानं ग्रासलंय. डॉक्टरांनी निदान केलं कॅन्सर म्हणून. ब्लड कॅन्सर.
त्यालाच का? याला काहीच उत्तर नाही. आईबापाच्या डोळ्याचं पाणी थांबत नाही. पाचवीतली भाग्यश्री अचानक मोठी झाल्यासारखी वाटते. मधली प्रियांका. तिला बालपणच नाही. आणि ते एवढंस पिल्लू, प्रेम. त्याला आपण आजारी पडतो. त्यामुळं शाळेत जायला मिळत नाही. एवढंच कळतंय.
बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा दहा लाख खर्च आहे. हॉस्पिटलचं कोटेशन इथं देतोय. यातही विशिष्ट शासकीय सवलतीत ही केस बसत नाही, असं हॉस्पिटलचं म्हणणं आहे. माझ्या सोसायटीतली काही मंडळी जिथून शक्य आहे, तिथून निधी उभा करण्याचा प्रयत्न करताहेत. ही ट्रीटमेंट संपूर्ण वर्षभर चालणार आहे. आम्ही काही जणांनी थोडेफार पैसे जमा केलेत. पण ते अर्थातच अपुरे आहेत. मला माहिती आहे, की एवढे सगळे पैसे एकाच ठिकाणी एका वेळी जमणं केवळ अशक्य आहे. पण प्रत्येकानं थोडाथोडा वाटा उचलला तर कदाचित हे शक्य आहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या अकाऊंटलाच पैसे जमा करायचे आहेत. बघा. जमलं तर आपण मिळून त्या प्रज्ज्वलला आणि या कुटुंबाला पुन्हा हसतंखेळतं राहायला मदत करू शकतो. विनंती आहे.

Monday, September 9, 2019

मुक्काम

पुन्हा दिलीप आला होता. काम काहीच नाही. बोलणंही फार काही नाही. उगीच आपला डोकावून जातो, तसा आला होता. त्याच्या मनात असलं की येतो. खरंतर माझ्या मनात असलं की येत असावा.
नेहमीसारखा पांढरा शर्ट, खाकी चड्डी घालून. बऱ्याचदा त्याच वेषात त्याला बघितलंय. कधी कधी धमक पिवळा शर्टसुद्धा असतो. पण त्याच्यावरही खाकी चड्डीच. तेव्हाही त्याच्याकडं एवढे दोनच कपडे होते. किंवा मला तरी तसं वाटायचं. पिवळ्या रंगाचा त्याचा तो शर्ट त्यानं एकदाच घातला होता. आमची सहल गेली होती त्यादिवशी. एरवी पांढराच.
इयत्ता दुसरी ते सातवी एवढी वर्षं आम्ही एकत्र होतो. म्हणजे एका वर्गात. त्यातही सातवी इयत्ता काही त्यानं पूर्ण केलीच नाही. मध्येच सोडून गेला. म्हणजे जेमतेम साडेचार वर्षांची मैत्री. संगमेश्वरला प्राथमिक शाळा म्हणजे जिल्हा परिषदेचीच. केंद्र शाळा नं. २. तिथंच हा दिलीप मला भेटला. दिलीप माने. पहिली दोन वर्षे काही फार मैत्री नव्हती. नुसताच परिचय. मैत्री चौथीपासून सुरू झाली. माझे वडिल शिक्षक त्यामुळं माझ्यावर उगीचच हुशार असण्याचा आरोप होता. दिलीप हुशार होता. तेव्हा नंबरचं खूप खूळ होतं. दिलीप पहिल्या तीनात असायचा. मी, दिलीप, अभिजीत, मंदार. आलटून पालटून त्यात हजेरी लावायचो. दिलीप आणि मंदार माझ्या घरी कधीकधी अभ्यासाला यायचे. त्यात सगळंच आलं अभ्यास, खेळ, गप्पा. मंदारच्या घरी मी खूप वेळा गेलो. पण दिलीपच्या घरी एकदाही नाही. त्याच्या घराविषयी त्याच्याशी बोलण्यातूनच कळायचं.
हा दिलीप म्हणजे तीन बहिणींमध्ये एकटा भाऊ. म्हणून काही कोडकौतुक नाही. पण नाही म्हटलं तरी वेगळी वागणूक होतीच. वडिल पाथरवट. दगड फोडणारे. आईही तेच काम करायची. विजापूर किंवा तिकडंच कुठंतरी मूळ गाव होतं. तिथून पोटापाण्यासाठी कोकणातल्या खेड्यात आलेले. कधीतरी फार पूर्वी आले असावेत. तेवढं आता मला आठवत नाही. पण हा गडी सुरूवातीपासून याच शाळेत असायचा. काळाकभिन्न. त्याच्या वडिलांना आणि काकाला बघितलं होतं. तेही दोघं असेच. पण त्यांचा काळा वर्ण वेगळाच. विठ्ठलासारखा काळा. त्वचा तकतकीत. पॉलिश केल्यासारखी.
अशिक्षितपणा आणि जोडीला गरीबी. त्यातनं येणारी निराशा, अपमान, अवहेलना त्याचे वडिल दारूत बुडवून गिळायचे. मेंदूवरचा ताबा सुटला की मग कुटुंबावर हात उगारला जायचा. कधीमधी दिलीपवरही पडायचा. पण त्याला त्याचं विशेष काही वाटायचं नाही. त्यावेळी कुठल्याच लहान मुलाला माराचं काही वाटायचं नाही. एकदम सामान्य गोष्ट होती. तरी याही परिस्थितीत त्याच्यासमोर आदर्श होता त्याचा काका. त्याचा हा काका माझ्या वडिलांचा विद्यार्थी. तो एस्.टी. मध्ये कंडक्टर म्हणून नोकरीला लागला. दिलीपला त्याच्यासारखं व्हायचं होतं. तसंही माझ्या लहानपणी कुणालाच अंतराळवीर वगैरे व्हायची स्वप्न पडत नसत. डॉक्टर इंजिनिअर नाहीतर बँक. पण याला काही होण्यापेक्षा कमावून घरातलं दारिद्र्य, दुःख घालवायची घाई होती. त्याच्या पायात चपलाही नसायच्या. त्याची स्वप्नं काय वेगळी असणार होती?
माझ्या आईला तो सांगायचा की मी खूप शिकणार आहे. लवकर कमवायला लागणार आहे. बहिणींची लग्न करायचीत. पत्र्याच्या खोलीत सहा-सात जणांचं कुटुंब राहायचं. त्यात हा अभ्यास करायचा. रॉकेलचा दिवाच असायचा बहुतेक. नक्की आठवत नाही. अशात अभ्यास करून पाचवीत त्याला आणि मला विभागून पहिला क्रमांक मिळाला. माझे बाबा मला म्हणाले होते की कोण आहे हा दिलीप माने. मी त्याला बक्षीस देणार आहे. खरं सांगतो, खूप वाईट वाटलं होतं. पूर्णपणे प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून मुलगा आपल्याबरोबरीनं पहिला नंबर मिळवतो म्हणजे काय? मित्रच होता माझा. पण तरी खूप राग आला होता.
तरी बऱ्याचदा एकत्र अभ्यास करायचोच. कुठल्या कुठल्या परीक्षा द्यायचो. आपल्या घरची बरी परिस्थिती आहे. त्याची अजिबात नाही. तो पुस्तकं कशी आणत असेल. शाळेत एखाद्या परीक्षेची फी कशी भरत असेल. एवढा विचार करण्याचं वयं नव्हतं. समजही नव्हती. कधी आजारी पडला तर सरकारी दवाखान्यातून औषध आणून पुन्हा कामाला लागायचे लोक. तसाच हा पण.
सातवीत गेल्यावर काही दिवसांनी दिलीप मधनंअधनं गैरहजर असायचा. सारखा आजारी पडायचा. तसंही कोकणातल्या पावसात मुलं गैरहजर राहायचं प्रमाण वाढायचंच. पण दिलीपला माझ्यासारखी दांड्या मारायचा छंद नव्हता. त्याला शाळेत यायला मनापासून आवडायचं. पण पावसाळा संपला तरी त्याचं आजारपण असायचंच. त्याला खोकला झाला. कमीच होईना. आमचा अभिजीत बातमी घेऊन आला की दिलीपला उपचारांसाठी मिरजेला घेऊन गेलेत, मिशन हॉस्पिटलमध्ये. त्याला टीबी झाला होता. टीबी झाला की मिशन हॉस्पिटल, मिरज इथं नेतात असं मला वाटायचं. कारण आमच्या जवळच्या एकाला तिथं नेलं होतं. त्याचा टीबी पूर्ण बरा झाला.
मला आठवलं की कधी कधी तास सुरू असतानाही तो खोकायचा. मुलांना आपला त्रास होऊ नये म्हणून मागच्या बाकावर बसायचा. तोंड दाबून खोकायचा. एकदा असाच खोकल्याची उबळ आली. तोंड दाबून खोकताना चित्रविचित्र आवाज आले. आमच्या वर्गावर तेव्हा ऑफ तासावर एक सर बदलून आले होते. ते सरही शाळेत नवे होते. विचित्र आवाज ऐकून मुलं हसायला लागली. सरांना वाटलं की हा मुद्दाम करतोय. म्हणून त्यांनी त्याच्या पाठीत गुद्दा घातला. तो कळवळला. सगळा वर्ग एकदम शांत झाला. सुन्न झाला होता बहुतेक.
बरेच दिवस मध्ये गेले. कधीमधी दिलीपविषयी कळायचं. प्रकृतीत सुधारणा आहे असं समजायचं. बरं वाटायचं.
तेव्हा संगमेश्वरला घरासमोर मोठं अंगण होतं. संध्याकाळी तिथंच मुक्काम. बाबा शेजारच्या सप्रे काकांशी गप्पा मारत होते. आम्ही मुलंही तिथंच होतो. आमच्याही काहीतरी गप्पा सुरू होत्या. खूप वाजले नव्हते. पण अंधार पडला होता. हळूहळू गप्पांमधला माझा सहभाग कमी झाला. मलापण कळलं नाही. लांब कुठंतरी अंधारात पाहत होतो बहुतेक आणि माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. हळूहळू मी हुंदके द्यायला लागलो. सगळ्यांच्याच लक्षात आलं ते. बाबांनी मला जवळ घेतलं. समजावत राहिले. सांगितलं की दिलीप बरा होऊन येईल परत खेळायला. पण माझं रडू कमीच येईना.
दुसऱ्या दिवशी बातमी आली की आमचा दिलीप माने आम्हाला सोडून गेला. टीबीनं त्याचा घात केला. सुरूवातीला उपचार झाले नाहीत किंवा देवदेवस्कीचे उपचार झाले बहुतेक. त्यामुळं मिरजेला न्यायला उशीर झाला. बरेच काही काही ऐकायला मिळालं. कारण काहीही असो. दिलीप आम्हाला भेटणार नव्हता. शेवटचा कधी भेटला तेही आठवत नाही. त्याचा व्यवस्थित निरोप घेतला का तेही लक्षात नव्हतं. बहुतेक पांढरा शर्ट खाकी चड्डीमध्येच भेटला होता तो शेवटचा.
आदले दिवशी जेव्हा मी हुंदके देऊन रडत होतो, तेव्हाच तिकडं त्याचं जीवन संपलं होतं.
माझी आजी गेली तेव्हा मी दुसरीच होतो. तेव्हा तो आघात फार काही जाणवला नसावा. कुणी जातं म्हणजे काय होतं हे फारसं कळलंच नव्हतं. तोपर्यंत जाणं म्हणजे नक्की काय होतं हे जरी माहित नव्हतं तरी हे नक्की माहित होतं की दिलीप गेला म्हणजे तो कधीच कुणालाच हाडामांसाचा म्हणून दिसणार नव्हता. त्याचं शरीर चालवणारी ऊर्जा संपली. तो गेला.
तर तेव्हापासून हा मधूनअधून मला ढोसतो. काय माहित? पण तो आठवला नाही असे सलग काही महिने गेलेत असं काही झालं नाही. काही ना काही कारणाने असेल किंवा काहीच कारण नसेल. पण दिलीप असा मधून अधून डोळ्यासमोर येतोच. तो तसा निघून गेला. त्याचा एक फोटो अभिजीत घेऊन आला. आम्ही वर्गणी काढून फ्रेम केला. आमच्या सातवीच्या वर्गात होता तो. आताचं माहिती नाही. पण मला दिलीप जसाच्या तसा आठवतो. तेव्हा तो गेला म्हणतात. कदाचित तो मनातून कधीच गेला नसेल. मुक्काम असेल. येईल परत थोड्या दिवसांनी. कदाचित आजसुद्धा.

Monday, September 2, 2019

उदंड असू दे!


“माजघर.. उदंड असू दे! स्वयंपाकघर.. उदंड असू दे!”
गणपती घरी आले की पहिलं काम म्हणजे त्यांना घर दाखवायचं. टिचभर अपार्टमेंटमधली एक एक खोली दाखवत जुन्या मोठ्या बैठ्या घरातील प्रशस्त खोल्यांची नांवं घ्यायची. माझी आई हे काम उत्साहानं करायची. तेवढंच त्या प्रशस्त घराच्या आठवणीत तिला रमतां यायचं. प्रत्येक खोलीचं नांव घेताना पुढं ‘उदंड असू दे’ म्हणायची. गणपती बुद्धीची देवता. त्यात आपल्या घरी आलेला. मग त्याच्याजवळ थेट मागणी केली की कशाला कमी पडायचं नाही, असं कदाचित तिला वाटत असेल. गणपतींनं तिचं ऐकलं का नाही माहिती नाही. आपल्या घरी येऊन त्याला वर्षातून एकदा सांगण्यापेक्षा आमच्या सगळ्यांच्याच वतीनं त्याला सतत विनवणी करायला ती बहुतेक कायमची त्याच्या घरी गेली असावी. हे “उदंड असू दे” मात्र आम्ही पण सुरू ठेवलंय.

गणपतीला कितीतरी जणांच्या कितीतरी मागण्या ऐकून पूर्ण करायच्या असतात. त्यामुळे काहीजणांनी हे उदंड असण्याचं प्रकरण फारच मनावर घेतलंय. अगदी फार पूर्वीपासून. म्हणजे माणसाच्या उत्क्रांतीपर्यंत जायची गरज नाही. पण प्रत्येक गोष्ट उदंड हवी आणि ती कुणाच्याही आधी मलाच हवी. किंबहुना फक्त मलाच हवी ही वृत्ती आपण आपल्या आजूबाजूलाही पाहतोच. आपल्याला हवी ती गोष्ट गणपती देवो न देवो, त्यासाठी बुद्धी मिळाली नाही तरी चालेल. कधी शक्तीच्या तर कधी धनाच्या बळावर हवं ते आपल्याच टोपलीत घेणार माणसं आपण पाहतोच. त्यासाठी दुसऱ्याच्या हक्कांना तुडवून, चोळामोळा करून टाकला तरी चालेल, असंच त्यांचं म्हणणं असतं.
त्यांच्यासारखे माणसांचे हक्क तर ते घेतातच पण निसर्गालाही सोडत नाही. माणसं कशी उलटून अंगावर येऊ शकतात. कायद्याचा वापर करू शकतात. पण निसर्गाला वकीलच नाही. खायला नाही, मार एखादा प्राणी. डास चावला, चिरडून टाक. साप घरी आला, टाक जाळून. माझ्या रस्त्यात झाड आलं, टाक तोडून. उदंड हवं चा हा हव्यास कधी कधी अती झाला की निसर्ग आपला समतोल बरोबर करतो. त्याला उदंडपणाचा हव्यास नाही. आपण म्हणतो निसर्गानं सूड उगवला. शेवटी माणसंच आपण. आपल्याच पद्धतीनं विचार करणार. पण हा निसर्गाचा समतोल असतो. कधी दुष्काळ पडतो, अती पाऊस पडतो, महापूर धुवून काढतो, त्सुनामी सगळं उलथवून टाकते, भूकंपाचे दहा सेकंद मुळापासून उपटून काढतात. सगळं होतं. चार दिवस जातात. कोलमडलेली आय़ुष्ये परत उभी राहतात. तोपर्यंत दीनवाणी वाटतात. त्यांचे हाल बघितले की राग येतो निसर्गाचा, परमेश्वराचा. पण एकदा का आयुष्य सुरळीत झालं की परत पहिल्यासारखं निसर्गाकडून ओरबाडून घ्यायला सुरू करतात.
प्रत्येक माणसाला उदंड म्हणजे किती उदंड हवं हे ज्यांचा त्याला कळतं. भूक भागली की प्राणी अन्नाला तोंड लावत नाही. पण भूक भागली तरी ज्यांचा हव्यास सुटत नाही ती माणसं. मग गाडी थांबवणं अवघड होतं, वाटेत येणाऱ्या सगळ्यांचा चेंदामेंदा करत ती सुसाट सुटते. उतारावरची गाडीही कुठंतरी जाऊन आदळतेच किंवा बुडते तरी. पण वेगाचा उन्माद विवेकाला दाबून टाकतो. मध्ये एका कार्यक्रमात एक काका भेटले होते. सातारकडचा शेतकरी गडी. डोक्यावरच्या चांदीच्या शेतीची अनुभवानं मशागत केलेली. ते म्हटले की आता पाचशे फूट खणलं तरी बोअरिंगला पाणी लागत नाही. म्हणजेच आपण आपल्या वाट्याचं पाणी केव्हाच संपवलंय. आता वापरणार तो प्रत्येक थेंब आपल्या पुढच्या पिढीचा आहे.
चार माणसं खाणारी असली तरी लोकं भ्रष्टाचार करून करोडो जमवून ठेवतात. पुढच्या पिढ्यांसाठी.
अशाच अतर्क्य हव्यासाची गोष्ट म्हणजे आरे कॉलनीतल्या झाडांच्या तोडणीची बातमी.
आपल्या मानवजातीची गाडी उताराला लागली आहे, मित्रांनो! पुढच्या पिढीसाठी काय राहणार हा विषयच नाही. ‘उदंड असू दे’ च्या हव्यासात पुढची पिढीच आपण ठेवणार आहे का हा विचार जास्त महत्त्वाचा वाटतोय.

Tuesday, June 18, 2019

श्रीमंत


"साब कुछ खाने को दो ना.. सुबह से कुछ नहीं खाया.."
चिरक्या आवाजात त्या भिकाऱ्याच्या पोरींनी आमच्यासमोर हात पसरले. भिकेसाठीची गुंतवणूक म्हणून हातात आधीची चिल्लर होती. आठदहा दिवसात केसांना पाणी लागलेलं नसावं. थोडीफार तीच अवस्था चेहऱ्याची. चेहऱ्यावर कमावलेली अजीजी. भीक मिळण्यासाठी याच गोष्टी कदाचित अधिक उपयोगी ठरत असाव्यात. मात्र यांच्या डोळ्यातून बालपण अजून पूर्णपणे हद्दपार झालं नव्हतं. म्हणूनंच जेव्हा त्यांनी भीक मागायला हात पसरले तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाहायचं मी टाळलं. नेहमी असंच करतो मी. बाकी निगरगट्ट बनता येतं. पण डोळ्यात पाहिलं कि संपलं. कदाचित हादेखील त्यांच्या प्रशिक्षणाचा भाग असेल. मी तरी त्याला नेहमी भुळतो. पण यावेळी मात्र वाडेश्वरमधून बाहेर पडताना जेव्हा त्या भिकाऱ्याच्या पोरींनी भीक मागितली तेव्हा शिताफीनं त्यांच्या डोळ्यात न पाहता मी त्यांना टाळून पुढे आलो. मला वाटलं तोसुद्धा तसंच करेल. त्यामुळं मी त्या भिकाऱ्यांच्या अजिजीच्या आणि माझ्या कनवळूपणाच्या मर्यादेच्या थोडं पुढं येऊन थांबलो. पुरेसा लांब आल्यावर मागं वळून पाहिलं. मला असंच वाटत होतं कि हा पठ्ठ्या माझ्या मागंच असेल. पण हा गडी त्या पोरींच्या इवल्या तळहातावर नाणी ठेवत होता. पैसे मिळाल्यावर त्या पोरी ताबडतोब दुसऱ्या दात्याकडं याचना करायला पळाल्या.
माझ्या कपाळावर आठ्या असतील असं गृहीत धरूनच तो हसला, "ओके.. लेक्चर नको आता."
"लक्ष्मी घरी पाणी भरते आहे. दोन चार शिंतोडे इकडं तिकडं उडाले तर काय फरक पडतो?" माझ्या बोलण्यातला उपरोध त्याला कळतो.
आमचा असा वाद नेहमीचा आहे. मग मी त्याला म्हणतो कि आपण कष्टानं, बुद्धीनं पैसे मिळवतो.. आणि लहान मुलांना भीक दिली कि मग त्यांना कष्टाची सवय कशी लागणार. त्यावर त्याचा युक्तिवाद असतो कि आपल्या हक्काचे पैसे क्लायंटकडून घ्यायला आपल्यालादेखील भिकाच मागाव्या लागतात. आपण काही शे रुपये मोजून खातो. अर्थातच तिथं जायची कुणाची सक्ती नसते. त्यामुळं अशा ठिकाणाहून खाऊन बाहेर पडतो आणि समोर कुणी उपाशी दिसलं तर बरं नाही वाटत. त्यात लहान मुलं असतील तर लॉजिक तसंही कोलमडतं. उगाच अपराधीपणा येतो. मला अर्थातच हि गोष्ट पटत नाही. मग तो मला अन्नसाखळी बद्दल सांगतो कि एकूण पैशावर प्रत्येकाचा हक्क आहे आणि आपल्याकडून त्यांच्याकडे पैसा गेला तर तो पुन्हा आपल्याकडे येतो. यालाच अर्थव्यवस्था म्हणतात वगैरे.
पण गेल्या दहा वर्षात तरी माझा मित्र बदलेला नाही. बरं, हा इसम पक्का भांडवलवादी आहे. साम्यवाद इत्यादी शब्द याच्या आसपासही भटकत नाहीत. याचं स्वतंत्र लॉजिक आहे. तो त्याच तंत्राने चालतो. त्याच्या अशा वागण्यामुळं आतापर्यंत तरी फार नुकसान झालेलं नाही. अडल्यानडल्या कुणालाही हा मदत करणारच. कुणी थेट मदत मागितली तर समजू शकतो. पण हा इसम असा आहे कि जर याला कळलं कि एखाद्याला मदतीची गरज आहे तर हा त्याच्यपर्यंत मदत पोहोचवायचा शक्य तेवढा प्रयत्न करतोच. बऱ्याच वेळा उधार दिलेले पैसे परत आलेत. काहीवेळा बुडलेत. काहीवेळा अधांत्तरी राहिलेत. विश्वासानं वेळेला मदत केल्यानंतर कुणी पैसे परत द्यायची टाळाटाळ करतो, अशावेळी त्यालाही राग येतो. पण त्यापेक्षा माणूस दुरावल्याचं त्याला वाईट वाटतं. काहीवेळा लोक गैरफायदा घेतात. पण याचा माणसांच्या चांगुलपणावर जास्त विश्वास आहे.
मागच्या महिन्यात एकदा असाच फोन केला तर मला म्हणाला कि थोड्या वेळाने परत फोन करतो. का तर कुलर खरेदी करतोय. त्यावर काहीच बोलणं झालं नाही. मला कळेना कि याच्या घरी तर एसी आहे. याला कुलर कशाला हवा? मी पण काहीतरी कामात होतो. विसरलो.
त्यानंतर जेव्हा भेट झाली, तेव्हाही विचारायचं राहून गेलं. पुन्हा एकदा वाडेश्वरमध्येच काहीतरी विषय निघाला. तेव्हा लक्षात आलं. त्याला कुलरबद्दल विचारलं.
तर म्हटला, "हो, ते कुलर घ्यायचे होते. म्हणून तर विजय सेल्सला गेलो होतो."
"बरोबर आहे. टेरेसवर उकडत असेल नाही? किंवा कारमधून घेऊन जात येतो. ज्यांच्याकडं एसी नसतो, त्यांच्याकडं गेलं कि अडचण येत असेल." उपरोध हा आमच्या बोलण्याचा स्थायीभाव आहे. त्याशिवाय अन्न पचत नाही.
"नाही.. अरे टेरेसवर एसी बसवला आणि एसी नसलेल्यांच्या घरी आपण तसाही जात नाही."
"ते पण खरं आहे. मग? आणला का कुलर?"
"आणला म्हणजे काय? तसाही तेच आणून देतात. पण चार होते ना.. त्यांना पत्ते दिले. त्यांनी डिलिव्हरी केली."
नेहमी आम्ही करतो ती चेष्टा वेगळी आणि हि गोष्ट वेगळी. ते एसी नसणाऱ्या घरी जात नाही वगैरे गंमत होती. मला वाटलं तसंच चार कुलरचं असेल. पण हा माणूस खरं बोलत होता.
"चार कुलर? सेल्समनने पार्टी केली असेल.. किस ख़ुशी में?"
"अरे घरी चार मोलकरणी आहेत. चौघींना एक एक."
"seriously?"
"अरे हो तर? त्या आपापसात बोलत होत्या ते बायकोनं ऐकलं. कि पत्र्याच्या घरामध्ये राहतात रे त्या. घरात इतकी माणसं. एवढं उकडतं. झोप पूर्ण होत नाही."
नेहमीप्रमाणे मी गपगार. एक कुलर सात आठ हजारांचा तरी असेल. म्हणजे तीसेक हजार रुपये खर्च केले यानं. पैसा असणं वेगळं आणि तो खर्च करता येणं वेगळं. त्यातसुद्धा दुसऱ्याचं दुःख समजून घेत त्यांची अपेक्षा नसताना खर्च करायला हत्तीएवढं काळीज हवं.
माझ्या मित्राला मी इतकी वर्षं ओळखतोय. तो काहीही करू शकतो हे मला माहित आहे. पण गंमत हि आहे कि खाली पडलेलं नाणं कुणी उचलून देत असेल तर फोटो काढून आपणच त्याला मदत केल्याचं फेसबुकवर जाहीर करण्याच्या काळात पत्र्याच्या घरात राहणाऱ्या मोलकरणीच्या मुलांना शांत झोप मिळावी म्हणून त्यांना कुलर देतो आणि साधं कुणाला सांगत पण नाही. अर्थात माझ्या मित्राला मी अनेक वर्ष ओळखतो आणि तोच असा करू शकतो, हे मला चांगलं माहित आहे.
म्हणूनच मी त्याचं नावंही घेतलं नाही. कारण त्याला आवडणार नाही.
"श्रीमंती हि वृत्ती आहे. तिचा पैशाशी फार संबंध नाही," असं हा एकदा म्हणाला होता.
कागदोपत्री मध्यमवर्गीय असलेला असा दिलदार राजामाणूस तुमच्याही पाहण्यात असेल. तेव्हा मला त्याच्याविषयी काय वाटतं ते तुम्हाला कळेल. याच्या हृदयाच्या खजिन्याची संपत्ती म्हणून मोजदाद केली तर त्याच्या आयकरात भारत नक्की मोठी अर्थव्यवस्था होईल.

Friday, March 15, 2019

Kuchal do, Masal do

“How’s the josh??”
Yeh naya india hai! Ghar mein ghusega bhi aur maarega bhi!!

Pulwama ke shaheeedon ko samarpit, 
naya Hindi song!

Jai Hind!!